
कोरोना या विषाणूची साथ आल्यापासून पॅन्डेमिक, इन्क्युबेशन पीरियड, आयसोलेशन, क्वारंटाइन हे शब्द वारंवार ऐकू येत आहेत. या ‘मेडिकल टर्म्स’मुळे सामान्य माणूस गोंधळून गेला आहे. विशेषतः क्वारंटाइन हा शब्द दहशतीसारखा वाटतो आहे; पण कुठलीही साथ आटोक्यात आणण्याकरिता क्वारंटाइनसारखा उत्तम पर्याय नाही याबद्दल दुमत नाही. या शब्दामागची भिती, दहशत कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट करणारा, बाल आरोग्य संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर दाभाडकर (महाड) यांनी लिहिलेला हा लेख…
…….
‘क्वारंटाइन’ म्हणजे नेमके काय?
मराठीत या शब्दाकरिता ‘विलगीकरण’ हा शब्द वापरला जातो. विलगीकरण याचा साधा सोपा अर्थ ‘विलग करणे.’ याचाच अर्थ ज्या व्यक्तीपासून कुठलाही संसर्गजन्य आजार समाजात पसरला जाण्याची शक्यता आहे, त्यांना विशिष्ट काळापुरते समाजापासून विलग करून ठेवणे, जेणेकरून हा आजार समाजात पसरणार नाही.
आयसोलेशन आणि क्वारंटाइन या संज्ञा वेगळ्या
आयसोलेशन (isolaton) व क्वारंटाइन (quarantine) हे दोन वेगळे शब्द असले, तरी बऱ्याचदा ते एकाच अर्थाने वापरले जातात, हे चुकीचे आहे. ‘आयसोलेशन’ हे ज्यांना आजार झाला आहे, निदान निश्चित झाले आहे त्यांचे करतात व त्यांना रुग्णालयात अॅडमिट करून उपचार चालू केले जातात. याउलट, विलगीकरण म्हणजे ज्यांना हा आजार नाही, ते रुग्ण नाहीत, पण रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या निरोगी व्यक्ती. कदाचित त्यांच्यामुळे समाजात हा आजार पसरण्याची शक्यता असते. अशा निरोगी व्यक्तींना आजाराचे लक्षण नसतानाही समाजापासून विशिष्ट काळाकरिता वेगळे करण्यात येते त्याला ‘क्वारंटाइन’ म्हणतात.
क्वारंटाइन हा मूळ इटालियन शब्द असून त्याचा अर्थ ‘चाळीस दिवस’ असा आहे.
क्वारंटाइन – उत्पत्ती व इतिहास :
क्वारंटाइन हा शब्द तेव्हा नव्हता, तरी अत्यंत प्राचीन काळी आजार पसरू नये म्हणून क्वारंटाइन केल्याचे दाखले वैद्यकीय इतिहासात आहेत. इ. स. ७०० साली काही चर्चेसने असे विलगीकरण केल्याचा इतिहास आहे. त्या दरम्यानच कुष्ठरोग्यांकरिता असे विलगीकरण केल्याची नोंद आढळते. अर्वाचीन काळात इ. स. १३००मध्ये ‘ब्लॅक डेथ’ नावाच्या आजाराकरिता (ज्याने युरोप व आशिया खंडात ३० टक्के लोकसंख्या दगावली होती असे म्हणतात) हे विलगीकरण केले होते. गेल्या एक-दोन दशकांत येलो फीवरकरिता (फिलडेल्फिया), प्लेग या आजाराकरिता (होनोलुलु, सॅनफ्रान्सिस्को) या पद्धतीचा वापर झाला. आत्ताच्या या कोरोना व्हायरसच्या साथीत आधी चीनने व नंतर इटलीने या पद्धतीचा अत्यंत काटेकोरपणे अवलंब केला व आता भारताबरोबरच अनेक देशात या आजाराचा फैलाव थांबविण्याकरिता क्वारंटाइन (विलगीकरण) करीत आहेत.
क्वारंटाइन किती काळाकरिता आवश्यक आहे?
कुठल्याही आजाराच्या जंतूंचा शरीरात शिरकाव झाला, की लगेच त्या आजाराची लक्षणे दिसत नाहीत. ही लक्षणे दिसण्याकरिता काही काळाचा कालावधी जावा लागतो. या कालावधीला इन्क्युबेशन पीरियड म्हणतात. कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोविड-१९ या आजारात ही लक्षणे जंतूंचा शिरकाव झाल्यापासून सरासरी दोन ते १४ दिवसांपर्यंत दिसून येतात. त्यामुळे कोविड-१९ या आजाराकरिता १४ दिवस विलगीकरण करतात. प्रत्येक संसर्गजन्य आजारात हा इन्क्युबेशन पीरियड वेगवेगळा असतो व त्यामुळे विलगीकरणाचा कालावधीही वेगवेगळा असतो.
आपण भारताचे नागरिक या बाबतीत गंभीर आहोत का?
अत्यंत दुर्दैवाने, या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. शासकीय सेवेतले आणि खासगी व्यवसायातले अनेक डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी, पोलीस, सर्व सरकारी यंत्रणा, शासनकर्ते, स्वतःचा जीव धोक्यात घालून युद्धपातळीवर या आजारांचा सामना करताहेत; पण दुर्दैवाने आम्हाला ना या प्रश्नांची गंभीरता कळली, ना महत्त्व.
आज अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली यांसारखे वैद्यकीय क्षेत्रात अग्रगण्य असलेले विकसित देशही हतबल झाले आहेत. आपल्या देशात तर वैद्यकीय उपकरणांची तीव्र वानवा आहे. आजाराचा उद्रेक झाला आणि केवळ तीन टक्के लोकांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागले, तरी आपल्याला पावणेतीन कोटी व्हेंटिलेटर्स लागतील. आहेत का आपल्या देशात एवढे व्हेंटिलेटर्स?
आत्ताच एका वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता असलेल्या डॉ. कानन येळेकर यांचा एक मेसेज आला. मेसेज कसला, अत्यंत उद्विग्न मनस्थितीत त्यांनी भारतीयांच्या मानसिकतेचे या आजाराच्या संदर्भात केलेले ते लिखाण आहे. शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत असताना, झुंज देत असताना एक विद्वान महाशय म्हणतात, ‘ही लोकशाही आहे, सरकारला आम्हाला घरी बसवण्याचा काय अधिकार?’ त्यांचं पत्र वाचताना मन विषण्ण झालं.
आजही या विलगीकरण केंद्रातून लोक पळून जाताहेत आणि हजारो, लाखो लोकांना कोरोनाचा प्रसाद वाटताहेत. शासकीय यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची ही वेळ आहे. राज्यकर्ते टाहो फोडून सांगताहेत ते त्यांच्या स्वार्थाकरिता नाही, तर या क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी दिलेले नियम आपल्याला समजावून सांगत आहेत. लाखो लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे, हे मान्य आहे; पण आता करोडो लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. जेव्हा हे करोडो लोक ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे किड्या-मुंग्यांसारखे मरायला लागतील तेव्हा फार वेळ झाला असेल.
नागरिकांनो, आत्ताच जागे व्हा :
या आजाराच्या रुग्णाच्या संपर्कात तुम्ही आलात, तर त्वरित शासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती द्या आणि विलगीकरण केंद्रात दाखल व्हा.
काही व्यक्ती विलगीकरण केंद्रातून पळून आल्या असतील, तर त्यांना परत तेथे पाठवा. घरात बसून राहा, वृद्धांची काळजी घ्या. सुट्टी दिली आहे, प्रवास स्वस्त झालाय, म्हणून पिकनिकला जाऊ नका. पचापचा थुंकायची आणि सर्वांसमोर शिंका द्यायची, खोकायची सवय मोडून टाका. शासनाचे (व पर्यायाने शास्त्रज्ञांचे) नियम काटेकोरपणे पाळा.
इटलीसारख्या टीचभर देशाची लोकसंख्या किती कमी आहे आणि साधनांची समृद्धी किती? पण कुणाला जगवायचं आणि कुणाला मरू द्यायचं हे निर्णय तिथल्या शासनकर्त्याला घ्यावे लागत आहेत आणि आपला पुढचा टप्पा हाच असू शकतो. तेव्हा आजच सावध व्हा!
– डॉ. चंद्रशेखर दाभाडकर (महाड)