रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ जून) सायंकाळपर्यंत मिळालेल्या अहवालांनुसार करोनाबाधितांची संख्या ४४५ झाली आहे, तर दिवसभरात १९ जण बरे होऊन घरी गेल्याने करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३२० झाली आहे. सिंधुदुर्गात आज चार रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, गेल्या दोन दिवसांत सिंधुदुर्गात नवा रुग्ण आढळलेला नाही.
रत्नागिरीची परिस्थिती
जिल्ह्यात आतापर्यंत १७ जणांचा करोनाने मृत्यू झाला. आता ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०८ इतकी आहे. आज दिवसभरात कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवनातील कोव्हिड केअर सेंटरमधील चार, जिल्हा शासकीय रुग्णालयातील तीन, कोव्हिड केअर सेंटर, साडवली येथील १०, कोव्हिड केअर सेंटर घरडा, लोटे येथील रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज सकाळी मिळालेल्या १४ पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण असे – दापोली – ३, रत्नागिरी – ३, कामथे – ८.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गात आज (१६ जून) चार रुग्णांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९८ झाली आहे. आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या १५४ असून, त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
……….
