रत्नागिरी : आज (सात ऑगस्ट) रात्री १० वाजून २० मिनिटांनी हाती आलेल्या अहवालानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात ८२ नवे करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २१४८ झाली आहे. नव्या ८२ रुग्णांमध्ये रत्नागिरीतील ३२, कामथ्यातील १७, कळंबणीतील १६, लांज्यातील पाच, गुहागरातील सात, देवरुखातील एक आणि अँटिजेन टेस्टमधील चार जणांचा समावेश आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ७) सायंकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये करोनाच्या तिघा रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या आता ७१ झाली आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २५ नवे करोनाबाधित आढळल्याने तेथील करोनाबाधितांची एकूण संख्या ४७६ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज मरण पावलेल्यांमध्ये राजापूर तालुक्यातील नाटे गावातील ६० वर्षीय महिला, राजापूर तालुक्यातील पाचल येथील एक महिला रुग्ण आणि राजिवडा, रत्नागिरी येथील एका ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक १९ मृत्यू रत्नागिरी तालुक्यातील असून, इतर तालुक्यांमधील मृतांची आकडेवारी अशी – खेड ६, गुहागर २, दापोली १४, चिपळूण १३, संगमेश्वर ७, लांजा , राजापूर ७, मंडणगड १.
आज सायंकाळच्या स्थितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २०६६, बरे झालेले १४४६ (प्रमाण ६९.९ टक्के), मृत्यू ७१, एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह ५४९. यात रात्री ८२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २१४८ झाली आहे.
गेल्या २४ तासांत ७५ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामध्ये जिल्हा रुग्णालय ११, समाजकल्याण भवन १४, कामथे, चिपळूण ५, माटे हॉल, चिपळूण २३, घरडा ,लवेल ६, पेढांबे, चिपळूण ८ आणि वेळणेश्वर, गुहागर येथील ८ जणांचा समावेश आहे.
सायंकाळपर्यंत सापडलेल्या पॉझिटिव्ह ५० रुग्णांचे विवरण असे – रत्नागिरी – १४, कामथे – १०, कळंबणी – १९, दापोली – २, देवरूख – १, ॲन्टीजेन टेस्ट – ४.
मुंबईसह एमएमआर क्षेत्र तसेच इतर जिल्ह्यांतून आल्या होम क्वारंटाइन केलेल्या रुग्णांमध्ये आजही वाढ झाली. आजअखेर त्यांची संख्या ३३ हजार ४१ आहे.