रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २५) नव्या ८१ करोनाबाधितांची भर पडली असून, दोघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ३५२५ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १००९ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरीतील आजच्या बाधितांचे विवरण असे – आरटीपीसीआर – रत्नागिरी १८, मंडणगड १, गुहागर १, कामथे ३. ॲन्टीजेन टेस्ट – रत्नागिरी ४, कळंबणी १२, चिपळूण ११, लांजा १, संगमेश्वर २१, परकार हॉस्पिटल ६, घरडा हॉस्पिटल ३.
आज ५७ जण बरे झाले. त्यात जिल्हा शासकीय रुग्णालयातील ३, कळंबणी २, संगमेश्वर २६, कामथे १, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन २, घरडा ८, माटे हॉल, चिपळूण ३ आणि होम आयसोलेशनमधील १२ जणांचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंत बरे झालेल्यांची संख्या आता २२३१ झाली आहे.
आज चिपळूण तालुक्यातील ८० वर्षांच्या आणि खेड तालुक्यातील ४२ वर्षांच्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या १२३ झाली आहे. त्यात खेडमधील १३ आणि चिपळूण तालुक्यातील २६ जणांचा समावेश आहे.
सध्या विविध रुग्णालयांमध्ये असलेल्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११७१ झाली आहे. आज संस्थात्मक विलगीकरणात असलेल्यांची संख्या ११२ असून, त्यात जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक ५१ जण आहेत. मुंबई आणि परजिल्ह्यातून आल्याने १३ हजार ३६५ जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत.
पत्रकारांची अँटीबॉडी तपासणी
रत्नागिरी जिल्ह्यात कोविड १९च्या सेरो सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचा एक भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने पत्रकारांसाठी अँटीबॉडी तपासणी शिबिर आज (२५ ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत सभागृहात घेण्यात आले. या वेळी २९ पत्रकारांची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याचाच अर्थ त्या पत्रकाराला कोणतीही लक्षणे न दिसता करोनाची लागण होऊन तो बरा झाला आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १००९ झाली आहे. त्यापैकी ५४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, ४५१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत सिंधुदुर्गात १६ जणांचा बळी करोनाने घेतला आहे. जिल्ह्यात सध्या १५१ कंटेन्मेंट झोन आहेत. दोन मेपासून जिल्ह्यात दोन लाख दोन हजार ३१६ व्यक्ती आल्या आहेत.
