रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (६ डिसेंबर) १५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर सात जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज ४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर तेवढेच रुग्ण करोनामुक्त झाले.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (सहा डिसेंबर) करोनाचे नवे १५ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८९०१ झाली आहे. आज तपासलेल्या अन्य १२२ जणांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधितांचा दर १३.८० टक्के आहे.
आजच्या बाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआर – संगमेश्वर ४, राजापूर ४ (एकूण ८); रॅपिड अँटिजेन टेस्ट – दापोली १, खेड १, गुहागर ३, लांजा २ (एकूण 7), दोन्ही मिळून १५.
जिल्ह्यात आज सात रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ८३६७ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९४.०० टक्के आहे. सध्या १५९ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. त्यापैकी ५४ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत रत्नागिरी तालुक्यात एका ५३ वर्षीय महिला रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या ३२२ आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.६२ टक्के आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (सहा डिसेंबर) ४ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ५४१४ झाली आहे. सध्या २६८ जण उपचारांखाली आहेत. आज चौघे जण करोनामुक्त झाले असून, जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण करोनामुक्तांची संख्या ४९९३ आहे. इन्सुली (ता. सावंतवाडी) येथील ६६ वर्षीय पुरुषाचा आज करोनामुळे मृत्यू झाला. त्यांना उच्चरक्तदाबाचा आजार होता. त्यांच्या मृत्यूमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १४७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.