रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (शनिवारी) करोनाचे नवे ३३ रुग्ण आढळले, तर १६ रुग्णांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. सिंधुदुर्गात नव्या १४ करोनाबाधितांची नोंद झाली.
रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार ९ (रत्नागिरी ४, खेड १, चिपळूण ४) तर अँटिजेन चाचणीनुसार २४ (रत्नागिरी ६, दापोली १०, गुहागर १, चिपळूण ३, लांजा ४) असे एकूण ३३ रुग्ण आज आढळले. दोन्ही चाचण्या मिळून जिल्ह्यात आज नवे ३३ रुग्ण आढळले. त्यांच्यासह जिल्ह्यात सध्या ८७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात होम आयसोलेशनमध्ये असलेल्या ३८ जणांचा समावेश आहे, तर सर्वाधिक २६ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या नऊ हजार ४३ झाली आहे.
आज चाचणी घेतलेल्या आणखी २०२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत चाचणी घेतलेल्या ५७ हजार ८४४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आज १६ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यांच्यासह आतापर्यंत एकूण आठ हजार ५८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज दाखल झालेल्या रुग्णांच्या तुलनेत घरी गेलेल्यांची संख्या कमी झाल्याने करोनामुक्तीचे प्रमाण घटून ९४.९२ टक्के झाले आहे.
आज रत्नागिरीतील ६५ वर्षीय महिला आणि चिपळूणमधील ५३ वर्षी पुरुष अशा दोघा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण मृतांची संख्या ३२७ झाली असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६१ टक्के आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे १४ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या पाच हजार ७३८ झाली आहे. सध्या सक्रिय असलेले ३६१ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचारांखाली आहेत. आज मुक्त झालेल्या १३ रुग्णांसह जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या पाच हजार २२० आहे. आतापर्यंत दुर्दैवाने १५१ जणांचा मृत्यू झाला.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media