काय आहे विजयादशमीचे महत्त्व?

शुक्रवार, आश्विन शुद्ध दशमी, दिनांक १५/१०/२०२१ रोजी दसरा म्हणजेच विजयादशमी आहे.
काय आहे या दिवसाचे महत्त्व?

यंदाचा श्री विजय मुहूर्त दुपारी ०२.२१ ते ३:०७ या वेळेत आहे.

विजयादशमी, दसरा म्हणजे अश्वपूजा, शमीपूजन, सीमोल्लंघनाचा दिवस. हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. मौल्यवान वस्तू खरेदीसाठी विजयादशमीचा दिवस शुभ मानला जातो. कोणत्याही शुभकामाचा प्रारंभ या दिवशी करायचा असतो. विजयादशमी या सणाची उत्पत्ती काही कथांद्वारे सांगितली जाते.

त्यातील एक कथा अशी : पैठण शहरात कौत्स नावाचा एक तरुण वरतंतू ऋषींकडे वेदाभ्यास शिकला. त्यानंतर त्याने गुरुदक्षिणेविषयी विचारले. तेव्हा वरतंतू ऋषींनी गुरुदक्षिणा नको, असे सांगितले. तरी कौत्साचे समाधान झाले नाही. त्याने गुरुदक्षिणेविषयी आग्रह धरला. तेव्हा वरतंतू ऋषींनी त्याला १४ कोटी सुवर्णमुद्रा द्यायला सांगितले. कौत्स १४ कोटी सुवर्णमुद्रा आणण्यासाठी रघुराजाकडे गेला. रघुराजाने तीन दिवसांची मुदत मागितली. रघुराजाने त्यासाठी इंद्रावर स्वारी करायचे ठरविले. इंद्राला ते समजले. इंद्राने रात्री कुबेराकडून गावाबाहेरील आपट्याच्या आणि शमीच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. रघुराजाने त्या सर्व सुवर्णमुद्रा कौत्सास दिल्या. त्या सर्व सुवर्णमुद्रा घेऊन कौत्स वरतंतू ऋषींकडे गेला. परंतु वरतंतूंनी त्यातील १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या. उरलेल्या त्यांनी स्वीकारल्या नाहीत. कौत्स त्या घेऊन रघुराजाकडे गेला. रघुराजाही त्या परत घेईना. शेवटी कौत्साने रघुराजाच्या सांगण्यावरून त्या उरलेल्या सर्व सुवर्णमुद्रा आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली ठेवल्या आणि लोकांना त्या लुटून न्यायला सांगितले. तो दिवस विजयादशमीचा होता. त्यामुळे या दिवशी आपट्याच्या व शमीच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा पडली.

आणखी एका कथेनुसार महिषासूर राक्षस सर्व लोकांना त्रास देत होता. तेव्हा परमेश्वराने अष्टभुजा देवीच्या रूपात आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून दशमीपर्यंत महिषासूर राक्षसाशी तुंबळ युद्ध करून त्याला ठार मारून विजय मिळवला. त्यावेळी देवीने विजया नाव धारण केले होते. म्हणून आश्विन शुक्ल दशमीला ‘विजयादशमी’ हे नाव मिळाले.

महाभारतकालीन एका कथेनुसार पांडव अज्ञातवासात राहण्यासाठी म्हणून विराटाच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी आपली सर्व शस्त्रे जंगलात शमीच्या झाडावर ठेवली होती. शेवटी अज्ञातवास संपल्यावर पांडवांनी सर्व शस्त्रे शमीच्या झाडावरून काढून घेतली. शमीच्या झाडाची आणि शस्त्रांची पूजा केली. तो दिवस आश्विन शुक्ल दशमीचा होता. विराटाच्या गाई पळवणार्याम कौरवसैन्यावर स्वारी करून पांडवांनी विजय मिळवला, तो याच दिवशी.

प्रभू रामचंद्रांचे पणजोबा रघुराजा सर्व दिशांच्या राजांना जिंकण्यासाठी याच दिवशी निघाले होते. प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तो हाच दिवस होता.

दसरा साजरा करण्यामागील शास्त्र व इतिहास
१. तिथी : आश्विन शुद्ध दशमी
२. व्युत्पत्ती आणि अर्थ : दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसऱ्याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव, गण इत्यादींवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो. दहा तोंडे असलेल्या रावणाचा वध याच दिवशी झाला, रावण हरला म्हणूनही या दिवसाल दशहरा म्हटले जात असावे.
३. समानार्थी शब्द
अ. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत.
आ. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच दसरा हा दिवस येतो; म्हणून याला ‘नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस’ असेही मानतात.

दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेला ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्यानाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. मग ते परमुलखातून लुटून आणलेल्या त्या संपत्तीतला एखादा नग त्या ओवाळणीच्या तबकात ठेवत. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवत. नंतर देवाला आणि थोरामोठ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे.

प्रारंभी दसरा सण एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात आणि दसर्यासच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर काढून देवाला वाहतात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथाही या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले. तसेच तो एक राजकीय स्वरूपाचा सणही ठरला.

दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे.
सण साजरा करण्याची पद्धत
या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात.
अ. सीमोल्लंघन
अपराह्णकाली (तिसऱ्या प्रहरी, दुपारी) गावाच्या सीमेबाहेर ईशान्य दिशेकडे सीमोल्लंघनासाठी जातात. जेथे शमीचा किंवा आपट्याचा वृक्ष असेल, तेथे थांबतात. शमी पाप शमवते (नष्ट करते). शमीचे काटे तांबूस असतात. शमी श्रीरामाला प्रिय बोलणारी असून अर्जुनाच्या बाणांचे धारण करणारी आहे. हे शमी, श्रीरामाने तुझी पूजा केली आहे. मी यथाकाल विजययात्रेला निघणार आहे. ही यात्रा तू मला निर्विघ्न आणि सुखकारक कर, अशी प्रार्थना केली जाते.
आपट्याची पूजा करताना पुढील मंत्र म्हणतात –
अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण ।
इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ।।

अर्थ : हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. नंतर त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्णनाणे (विकल्पाने तांब्याचे नाणे) ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात.

आपट्याची पाने सोने म्हणून देणे
शमीची नाही; पण आपट्याची पाने सोने म्हणून देवाला वाहतात आणि इष्टमित्रांना देतात. सोने हे लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते, असा संकेत आहे.

अपराजितापूजन
ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून पुढील मंत्राने प्रार्थना करतात.
हारेण तु विचित्रेण भास्वत्कनकमेखला ।
अपराजिता भद्ररता करोतु विजयं मम ।।

अर्थ : गळ्यामध्ये चित्रविचित्र हार घालणारी, जिच्या कटीत चकाकणारी सुवर्णमेखला आहे, अशी आणि (भक्तांचे) कल्याण करण्याच्या कामी तत्पर अशी अपराजितादेवी मला विजय देवो. काही ठिकाणी अपराजितेची पूजा सीमोल्लंघनाला निघण्याच्या पूर्वीही करतात.

शस्त्रे आणि उपकरणे यांचे पूजन
या दिवशी राजे आणि सामंत, सरदार आपापली शस्त्रे आणि उपकरणे साफसूफ करून ती ओळीने मांडून त्यांची पूजा करत असत. शेतकरी आणि कारागीर हे आपापली औते आणि हत्यारे यांची पूजा करतात. (काही लोक ही शस्त्रपूजा नवमीच्या दिवशीही करतात.) लेखणी आणि पुस्तके ही विद्यार्थ्यांची शस्त्रेच होत; म्हणून विद्यार्थी त्यांचे पूजन करतात. या पूजनामागील उद्देश हा की, त्या त्या गोष्टींमध्ये ईश्वराचे रूप पाहणे, अर्थात ईश्वराशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करणे.

राजविधान
दसरा हा विजयाचा सण असल्यामुळे या दिवशी राजेलोकांना विशेष विधान सांगितले आहे.

लौकिक प्रथा
काही घराण्यांतले नवरात्र (देवी) नवमीच्या दिवशी, तर काहींचे दशमीच्या दिवशी विसर्जित होते.


श्रीराम व हनुमान तत्त्वे आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा दसरा
दसऱ्याच्या दिवशी ब्रह्मांडात श्रीरामतत्त्वाच्या तारक, तर हनुमानतत्त्वाच्या मारक लहरींचे एकत्रीकरण झालेले असते. दसरा या तिथीला क्षात्रभाव जागृत होतो. या क्षात्रभावातूनच क्षात्रवृत्तीचा संस्कार होत असतो. दसऱ्याला श्रीराम व हनुमान यांचे स्मरण केल्याने दास्यभक्ती निर्माण होऊन श्रीरामाचे आशीर्वादरूपी तत्त्व मिळण्यास मदत होते. दसऱ्याच्या दिवशी ब्रह्मांडात लाल (शक्तिीरूपी) व तांबूस (दास्यभावातून निर्माण झालेल्या आशीर्वादरूपी लहरी) रंगांच्या स्प्रिंगसारख्या लहरी कार्यरत अवस्थेत असतात. या लहरींमुळे आत्मशक्ती जागृत होण्यास मदत होऊन जिवाच्या नेतृत्वगुणामध्ये वाढ होते.
आपल्याला आणि आपल्या परिवाराला दसर्या च्या अनंत शुभेच्छा…..

  • वेदसेवक श्री. शैलेश कुलकर्णी
    (संपर्क – 9423034885)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply