रत्नागिरी : समाजातील बदललेल्या परिस्थितीत परस्परांमधील विश्वासाचे नाते जपणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि व्याख्याते विजय कुवळेकर यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा करसल्लागार असोसिएशनच्या आठव्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन कार्यक्रम झाला. ते म्हणाले, सध्या नैराश्य आणि घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे, असे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. लग्न झाल्यानंतर अत्यंत थोड्या कालावधीत घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढलेय. मुलांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. याचं कारण आई-वडिलांपासूनच दुरावा आणि त्यातून येणारी असुरक्षितता. नवरा मोठ्याने घोरतो, वाढदिवसाला आवडीचा केक आणला नाही म्हणून घटस्फोट घेणारे लोक आहेत. पण यात व्यवहार आला, विश्वास नाही आणि हे नाते विश्वासाचे आहे.
श्री. कुवळेकर म्हणाले की, लहान मूल आईच्या कुशीत निर्धारस्थपणाने विसावते किंवा आईला बिलगते. त्याला विश्वास असतो, तो त्याला सांगता येत नाही. पती-पत्नी मैत्री, शिक्षक- पालक- विद्यार्थी, डॉक्टर-रुग्ण, वकील-अशील आर्थिक संस्था, दुकानदार- ग्राहक या सर्वांमध्ये विश्वास असावा लागतो. डॉ. राधाकृष्णन असं म्हणाले होते की माणसाला माणूस बनवतो ते खरे शिक्षण. आपण शिक्षणाची सांगड पदव्यांशी जोडलेली आहे. पदव्यांमधून आर्थिक उत्पन्नाशी जोडलेली आहे. सुदैवाने मोदी सरकारने जे नवे शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले आहे, त्यात संस्कारालाही महत्त्व आहे. चारित्र्याच्या जडणघडणीलाही महत्त्व आहे. मातृभाषेतून शिक्षणाला, मूल्य व कौशल्य शिक्षणाला महत्त्व आहे. त्याचा पाया भारतीयत्वाचा पाया आहे. शिक्षणाने नीतिमान माणूस घडवावा. दुर्दैवाने सरस्वतीच्या दरबारामध्ये लक्ष्मीचे माहात्म्य वाढवण्याचे प्रकार वाढले आहेत.
ते म्हणाले, कोणताही व्यवसाय विश्वासावरच अवलंबून असतो. माणसाच्या आयुष्यातून विश्वास वजा केला तर काही शिल्लक राहत नाही. शिक्षणाने फक्त पदवी मिळून उपयोग नाही तर संस्कार मिळायला हवा. शिक्षणाने चारित्र्य घडवले पाहिजे. तेव्हाच विश्वास बसतो. वाचकाचा आणि प्रेक्षकांचा नकाराधिकार ही आपल्याकडची मोठी ताकद आहे. तिचा वापर आपण सजग व्यक्तींनी योग्य वेळी केला पाहिजे. भारताच्या चार स्तंभांवरचा विश्वास जर ढळला तर अस्थैर्याला आमंत्रण असते. पण पुढच्या काळामध्ये याचे दुष्परिणाम दिसायला लागतील. राजकारणाचा प्रभाव नाही, असे एकही क्षेत्र नाही. शिक्षणापासून धर्मकारणापर्यंत कोणतेही क्षेत्र याला अपवाद नाही. आज मोठ्या शहरांपासून अगदी ग्रामीण भागातल्या खेडोपाड्यांतही फ्लेक्स, होर्डिंगचे साम्राज्य दिसते. सी. व्ही. रमन, लोकमान्य टिळक, वीर सावरकर, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी आदींचे संदर्भ देत कुवळेकर यांनी सुरेख मांडणी केली.
सध्या भोंदू बाबांचे फॅड वाढले आहे. अशा एका बाबांकडे गेलो असता, तुम्ही एवढं भक्तांना का फसवता, असे विचारल्यावर त्याने सांगितले की, लोकांची जर फसवून घ्यायची इच्छा असेल तर आम्ही काय करणार. यामध्ये घात होत आहे. एका बुवा- बाबाच्या मागे चार माणसे लागली की पाचवा आपोआप रांगेत उभा राहतो. सत्य कोणीच तपासत नाही आणि सत्य न तपासता ठेवलेला विश्वास हा धोकादायक असतो.
अध्यक्षस्थानी चिपळूण येथील प्रसिद्ध सीए विवेक रेळेकर होते. त्यांनी सीए, करसल्लागार यांच्या कामकाजाबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. मंचावर करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष सीए वरदराज पंडित, उपाध्यक्ष राजेश गांगण, कोषाध्यक्ष सीए अभिजित पटवर्धन, सचिव सीए वैभव देवधर उपस्थित होते.
रत्नागिरीतील प्रसिद्ध डॉक्टर प्रसाद पेठे यांच्या रुग्णसेवेबद्दल आणि उल्लेखनीय यशाबद्दल सीए अक्षय जोशी यांचा यावेळी विशेष सन्मान करसल्लागार असोसिएशनने केला. डॉ. पेठे यांनी रुग्णसेवेतील काही अनुभव सांगितले. सीए जोशी यांनीदेखील सीए, डिसा व अन्य पदवी परीक्षेतील यश कीर्तनसेवा यांची माहिती देत हा घरचा सन्मान असल्याबद्दल आभार मानले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

