देवरूख : रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीचा लोकशाही मेळावा येत्या २४ डिसेंबर रोजी देवरूख येथे पार पडणार आहे. मेळाव्याला गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे मार्गदर्शन करणार आहेत. यंदाचे मेळाव्याचे सहावे वर्षे आहे.
गाव विकास समितीच्या माध्यमातून दरवर्षी संविधान दिनानिमित्त लोकशाही मेळाव्याचे आयोजन केले जाते. यावर्षी हा मेळावा २४ डिसेंबर रोजी पार पडत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांचे लोकशाहीतील अधिकार समजावेत, लोकशाही मजबूत व्हावी व सर्वसामान्य नागरिकांनी लोकशाहीतील त्यांचे हक्क-अधिकार समजून घेऊन आपला सर्वांगीण विकास साधून घ्यावा, या हेतूने हा मेळावा आयोजित केला जातो, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस डॉ. मंगेश कांगणे यांनी दिली.
मेळाव्याला गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड, उपाध्यक्ष व कृषी तज्ज्ञ राहुल यादव, उपाध्यक्ष मंगेश धावडे, सरचिटणीस सुरेंद्र काब्दुले, जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यावेळी समाजात उत्तम काम करणाऱ्या महिलांचा स्त्रीशक्ती सन्मान देऊन गौरव करण्यात येणार असून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. गाव विकास समितीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभदेखील यावेळी होणार असल्याचे डॉ. कांगणे यांनी सांगितले.
देवरूखच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार असलेल्या या मेळाव्याला लोकशाहीप्रेमी जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन गाव विकास समितीने केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

