देवरूख : येथील रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीने घेतलेल्या छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्पर्धेत फाल्गुनी फेपडे हिने पहिला क्रमांक पटकावला आहे.
गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या संकल्पनेतून अध्यक्ष उदय गोताड, उपाध्यक्ष राहुल यादव, मंगेश धावडे व डॉ. मंगेश कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हास्तरीय छत्रपती संभाजी महाराज निबंध स्पर्धेचे आयोजन करते. यंदाचे स्पर्धेचे सहावे वर्ष होते. या स्पर्धेत कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाची गरज आणि कोकणातील दरवर्षीची पूरस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि उपाययोजना काळाची गरज हे विषय स्पर्धकांना देण्यात आले होते. स्पर्धेसाठी ५० हून अधिक निबंध आले. त्यातून दोन विजेते व पाच उत्तेजनार्थ स्पर्धक निवडण्यात आले.
स्पर्धेचा गुणानुक्रमे निकाल असा : फाल्गुनी संतोष फेपडे (कनिष्ठ महाविद्यालय, बुरंबी शिवने), ऐश्वर्या दिनेश शिंदे (खोरनिनको, लांजा), गौरी दिलीप शिवगण (आठल्ये, सप्रे, पित्रे महाविद्यालय, देवरूख), श्वेता संतोष गमरे (पिरंदवणे), प्रेरणा रवीनद्र करंबेळे (न्यू इंग्लिश स्कूल व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा), सुहास तानाजी गेल्ये (शिवने,तेऱ्ये), दीप्ती संजय सावंत (कला आणि वाणिज्य महाविद्यालय, साखरपा).
पहिल्या दोन विजेत्यांना अनुक्रमे ३३३३ आणि २२२२ रुपये, तर उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी एक हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे बक्षीस देण्यात येणार आहे.
बक्षीस वितरण समारंभ येत्या २४ डिसेंबर रोजी देवरूख येथे होणार असल्याची माहिती गाव विकास समितीच्या महिला अध्यक्षा दीक्षा खंडागळे यांनी दिली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

