राजापूर : कोकण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी आरमार ही शिवाजी महाराजांनी कोकणाला दिलेली सर्वांत मोठी देणगी आहे. तो इतिहास प्रत्येक कोकणवासीयाने लक्षात ठेवला पाहिजे, असे आवाहनपर उद्गार शिवव्याख्याते शाहीर सौरभ कर्डे यांनी केले.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे वाटूळ (ता. राजापूर) येथे झालेल्या दहाव्या ग्रामीण साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. त्यांनी शिवाजी महाराजांचे कोकणाशी असलेले नाते स्पष्ट केले. शिवाजी महाराज आणि कोकण या विषयावरील व्याख्यानात ते अत्यंत कळकळीने बोलत होते. शिवाजी महाराज पन्हाळागडावर असताना त्यांना सिद्दीने दिलेला वेढा आणि त्यामध्ये राजापूरकर इंग्रजांनी केलेली मदत याचा इतिहास श्री. कर्डे यांनी उलगडून सांगितला. पन्हाळगडावरून सुटून विशाळगडावर आल्यानंतर तातडीने त्यांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा श्री. कर्डे यांनी घेतला.
राजापूरच्या इंग्रजांनी मुघलांना केलेली मदत लक्षात ठेवून राजापूरची वखार खोलवर खोदून नष्ट करण्याची कामगिरी शिवरायांनी केली. माती आणि मतीशी इमान राखण्याचा संदेश शिवरायांनी कोकणवासीयांना दिला आहे, असेही श्री. कर्डे म्हणाले.
यावेळी संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल, भारताचार्य सु. ग. शेवडे आणि अन्य मान्यवर तसेच साहित्य रसिक उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media
