कोरोना विषाणूच्या संसर्गाने सध्या सारे जग व्यापले आहे. या पार्श्वभूमीवर, या महामारीच्या प्रतिबंधासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदातील उपाययोजनांचा चांगला उपयोग होऊ शकतो. सावंतवाडी येथील ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई यांनी याविषयी केलेले हे मार्गदर्शन…
………..
एकाच वेळी अनेक लोकांना व्याधीचा उपसर्ग होतो, त्याला ‘जनपदोध्वंसन’ (गावेच्या गावे उजाड करू शकणारा) असे आयुर्वेदात मानले जाते. या वेळची कोविड-१९ ही महामारी याच प्रकारची आहे. वायू, जल, देश आणि काल या चार घटकांचे प्रदूषण या महामारीला कारणीभूत असते. निसर्गाचा अनिर्बंध उपभोग घेण्याच्या आणि निसर्गावर विजय (???) मिळवू इच्छिण्याच्या प्रवृत्तीमुळे वरील चार घटकांचे प्रदूषण होते.
आपल्या निसर्गाला ओरबाडण्याच्या विकृत प्रवृत्तीमुळे आणि सदाचार अजिबात सोडल्यामुळे उपरोक्त चारही घटकांची विकृती झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून अनेक नवनवीन व्याधींची निर्मिती झालेली दिसते. अशा प्रकारच्या विकृती टाळण्यासाठी आयुर्वेद या आपल्या अस्सल भारतीय वैद्यकशास्त्राने दिनचर्या, ऋतुचर्या आणि सद्वृत्ताचरण असे विविध उपक्रम आखून दिले आहेत. दुर्दैवाने ‘पुराणातली वांगी’ ‘अंधश्रद्धा’, ‘बुरसटलेल्या अशास्त्रीय पद्धती’ या नावाखाली हे सर्व उपक्रम पद्धतशीरपणे दुर्लक्षिले गेले; अन्यथा कदाचित आपण ही महामारी टाळू शकलो असतो.
‘कोरोना’ची लक्षणे सर्व प्रसारमाध्यमांद्वारे सर्वांना माहीत झाली आहेतच. यामध्ये बहुतेक लक्षणे श्वसननसंस्थेशी संबंधित आहेत. प्रदूषित हवेचा संबंध प्रामुख्याने श्वसननसंस्थेशी येत असल्याने असे झालेले दिसते.
आता याचा प्रतिकार कसा करता येईल, ते पाहू –
१) आहार : ताप असेल तर वैद्याच्या सल्ल्यानुसार लंघन करावे. पेज, मऊ भात, चुरमुरे, लाह्या असा अगदी हलका, ताजा (आणि गरम) आहार असावा.
२) विहार : पूर्ण विश्रांती घ्यावी.
- पाणी कोमट प्यावे.
- शक्य असल्यास वाळा, चंदन, नागरमोथा, पित्तपापडा, काळा वाळा यांनी सिद्ध केलेले पाणी तहान लागेल त्याच वेळी प्यावे.
- रात्री जागरण करू नये.
- सकाळी सूर्योदयावेळी आणि सायंकाळी सूर्यास्तावेळी अग्निहोत्र करावे.
- सकाळी आणि संध्याकाळी धूप, वेखंड, तूप, कडुनिंब पाने, पांढरी मोहरी इत्यादी घालून घरात आणि घराच्या आवारात किमान सात दिवसांपर्यंत धूपन करावे.
- दशविध पापकर्मे टाळावी. षड्रिपूंच्या आहारी जाऊ नये.
- सैंधव आणि हळद घातलेल्या कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात.
- श्वसननसंस्थेला बल प्राप्त करून देण्यासाठी वैद्याच्या सल्ल्याने योगासने, प्राणायाम करावे.
- शासनाने आखून दिलेल्या मर्यादांचे काटेकोर पालन करावे.
३) औषधे – केवळ वैद्याच्या सल्ल्याने घ्यावी. बरे वाटल्यावर अपुनर्भवत्त्वासाठी रसायन-चिकित्सा घ्यावी.
या प्रकारे उपाय केला असता प्रत्येक रुग्णामध्ये १०० टक्के फायदा होतोच असे नाही. कारण रुग्णांची प्रतिकारक्षमता, व्याधीची तीव्रता, औषधांची अनुपलब्धता, अरिष्ट लक्षणे इत्यादी अनेक कारणांचा संबंध असतो.
प्रतिबंधक उपाय :
ज्यांना काहीही त्रास नसेल त्यांनी या महामारीपासून बचावण्यासाठी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी –
- वैद्याच्या साह्याने प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असावे.
- कोमट दुधात हळद आणि तूप घालून सकाळीच प्यावे.
- गवती चहा पाती, सुंठ, मिरी, ज्येष्ठमध घालून केलेला गरम काढा घ्यावा.
- शक्य असल्यास सोन्याचे वळे टाकून उकळलेले पाणी प्यावे.
- घरातून बाहेर पडताना कोमट केलेले खोबरेल तेल किरंगळीने नाकात व कानात फिरवावे.
- आंघोळीपूर्वी अर्धा तास सर्व अंगाला खोबरेल/तीळ तेल लावून कोमट पाण्याने आंघोळ करावी.
- बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुऊन कोरडे करून घरात प्रवेश करावा.
- समाजात मिसळण्याविषयीच्या शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
- फ्रिझमधील अथवा बर्फ घातलेले पदार्थ टाळावेत.
- वर निर्देश केल्याप्रमाणे घराचे नियमित धूपन करावे.
- अग्निहोत्र केल्यास अधिक उत्तम.
- आयुर्वेदोक्त दिनचर्या, ऋतुचर्या आणि सद्वृत्ताचरण अवश्य पाळावे.
- ऋतुचर्योक्त पंचकर्मे नियमित करून घ्यावी.
- अर्धशक्ती व्यायाम नियमितपणे करावा.
- समाजमाध्यमांवरील अनधिकृत माहितीने घाबरू/घाबरवू नये. आपल्या डॉक्टरांचा सला घ्यावा.
- श्वसनसंस्थेची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योगासने, प्राणायाम नियमितपणे आचरावे.
- प्रतिकारक्षमता कमी असलेल्यांची (वृद्ध आणि लहान बालके) विशेष काळजी घ्यावी.
वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई,
सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, पिन – ४१६५१०.
मोबाइल : ९४२२४ ३५३२३

