रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे संपूर्ण परिसरात बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे. अनेक मूर्तिशाळांमधून दूरच्या घरी गणपती बाप्पाच्या मूर्ती रवाना झाल्या आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून गणेशोत्सवाचे काम सुरू असून सध्या मूर्तींच्या देखण्या रंगरंगोटीचे काम अतिशय एकाग्रतेने करण्यात आले. बाप्पाची मूर्ती अधिक सुंदर देखणी व आकर्षक दिसावी यासाठी मूर्तिकारांनी दिवसरात्र मेहनत घेतली. मूर्तींची रंगरंगोटी हे अतिशय नाजूक आणि जबाबदारी असणारे काम असल्याने यात अधिक वेळ जातो. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे मातीच्या मूर्ती आणि मूर्तींचा रंग वाळायला पुरेसा अवधी मिळाला. त्यामुळे यावर्षी गणपतीच्या मूर्ती अत्यंत वेळेत तयार झाल्या. त्यामुळे त्या घरोघरी रवाना होऊ लागल्या आहेत. काही वाड्यमध्ये पारंपरिक वाद्यांच्या तालात वाजत गाजत मिरवणुकीने मूर्ती घरोघरी नेल्या जातात. आज भाद्रपद महिना सुरू झाल्यामुळे घरोघरीच्या मूर्ती रवाना होऊ लागल्या आहेत सार्वजनिक गणपतीच्या मूर्ती या आधीच स्थानापन्न झाल्या आहेत.
यावर्षी हरितालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी सोमवारी या एकाच दिवशी असल्यामुळे महिलांची विशेष लगबग सुरू आहे.
दरम्यान, मुंबई-पुण्यातून एसटीच्या जादा गाड्या तसेच कोकण रेल्वेवरील जादा गाड्या मधून चाकरमानी आपापल्या घरोघरी दाखल होऊ लागले आहेत. वार्षिक उत्सवाच्या तयारीसाठी त्यांचाही हातभार लागत आहे.
Follow Kokan Media on Social Media
