जे उमेदवार उभे आहेत, त्यापैकी त्यातल्या त्यात योग्य कोणता, आपला लोकप्रतिनिधी ठरायला लायक उमेदवार कोणता, हे तरी मतदार नक्की ठरवू शकतो. आपणच मतदारांचे भाग्यविधाते आहोत, असे या प्रत्येक उमेदवाराने आतापर्यंत अनेकदा प्रचारातून सांगितले आहे. पण त्यातही खरोखरीच कोण भाग्यविधाता ठरू शकतो, याचा निर्णय मतदारांनाच घ्यावा लागणार आहे. ते त्यांनी ठरवायला हवे. आवर्जून मतदान करणे हाच तूर्त तरी त्यावरचा एकमेव उपाय आहे. तो योजायला हवा.