रत्नागिरी जिल्ह्यात पाचपैकी चार जागांवर महायुतीचा विजय

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांमध्ये महायुतीचा विजय झाला आहे. रत्नागिरीत उदय सामंत, राजापूरमध्ये त्यांचे बंधू किरण सामंत आणि दापोलीत योगेश कदम हे शिवसेनेतर्फे विजयी झाले. चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम जिंकले. फक्त गुहागरची जागा भास्कर जाधव यांच्या रूपाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीला मिळाली आहे.

गुहागरच्या निकालाचे भवितव्य खऱ्या अर्थाने महिलांच्या हाती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी, दि. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाची जिल्ह्याची अंतिम सरासरी ६५.२३ टक्के आहे. विशेष म्हणजे यावेळी गुहागर मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिलांच्या मतदानाची आकडेवारी अधिक असल्यामुळे खऱ्या अर्थाने तेथील निवडणुकीचे भवितव्य महिलांच्याच हाती आहे.