छत्र्या नकोत, शिक्षक हवेत

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या चिन्हासह नेत्यांचे फोटो असलेल्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली की प्रचारावर बंधने येतात. पण त्याच्या आधीपासूनच उघडपणे प्रचार केला, तर उपयोग होतो, हे लक्षात घेऊन छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. अशा प्रचारात कल्पकता नक्कीच आहे; पण शाळांमधून प्रचार करणे योग्य आहे का, याचा विचार करायला हवा. शिवाय मुलांना छत्र्या देण्यापेक्षा पुरेसे शिक्षक दिले, तर शिक्षणाचा दर्जा सुधारायला मदत होणार आहे. त्याची खरी गरज आहे.

शाळांनीच घ्यावेत छंद वर्ग

ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेच्या शाळेच्या सहकार्यातून नाचणे येथील छंद वर्ग चालविला जात असल्यामुळे तो पूर्णपणे मोफत आहे. ग्रामस्थ आणि काही देणगीदार यांच्या मदतीतून हा वर्ग चालविला जातो. असा छंद वर्ग चालविणारी नाचणे ग्रामपंचायत बहुधा राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत असावी, पण रत्नागिरी जिल्ह्यातील मात्र जिल्हा परिषदेची ती एकमेव शाळा आहे. नाचणे शाळेचे हेच उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून जिल्हा परिषदेच्या शाळांनीच आता सुट्टीतील छंद वर्गांचे आयोजन करायला हवे.