अशी शाळा सातत्याने हवी

शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काही शाळांना भेट दिली आणि शालेय शिक्षण विभागाचीही शाळा घेतली. पालकमंत्र्यांनीच शालेय शिक्षण विभागाचे कान टोचले हे खूपच चांगले झाले. त्यातून काही चांगले घडेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. तरीही पालकमंत्र्यांनीही जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यांच्या मागण्या आणि आंदोलने हा विषय पूर्णपणे वेगळा आहे; पण भावी नागरिकांचा पाया ज्या शाळांमध्ये तयार होतो आणि ज्या शिक्षकांकडून तो तयार करून घेतला जातो, त्या शिक्षकांकडून मुलांच्या मनाची पुरेशी मशागत केली जाते का आणि ती केली जात नसेल तर त्याला नेमकी कोणती कारणे आहेत, याचाही शोध घ्यायला हवा.

वड्याचे तेल वांग्यावर

प्रशिक्षणाकरिता निघालेल्या शिक्षकांच्या वाहनाला अपघात झाला. प्रशिक्षणाकरिता नेमून दिलेले नियम शिक्षकांना आक्षेपार्ह वाटतात. प्रत्येक सत्रानंतर हजेरी घेणे, पाच मिनिटे विलंब झाला तरी गैरहजेरी लावणे, प्रत्येक सत्रानंतर चाचणी घेणे शिक्षक संघटनांना आक्षेपार्ह वाटते. प्रशिक्षणाला वेळेवर पोहोचण्यासाठी खासगी वाहनाने प्रवास करण्याची वेळ आल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. मात्र ही पळवाट आहे. प्रशिक्षणाचे नियम कडक करायला शिक्षकांच्या वर्तनानेच प्रशासनाला भाग पाडले असले पाहिजे, हेही संघटनांनी लक्षात घ्यायला हवे. प्रशिक्षणाबद्दलची नाराजी व्यक्त करताना वड्याचे तेल वांग्यावर काढून काय उपयोग?