प्रथितयश लेखक जयवंत दळवी यांच्या स्मृतिशताब्दीचा नुकताच समारोप झाला. त्यांच्या आठवणी जपणारा कार्यक्रम त्यांचे मूळ गाव असलेल्या आरवली आणि परिसरात वर्षभर साजरा करण्यात आला. एखाद्या व्यक्तीची आठवण त्याच्या शंभराव्या वर्षात वर्षभर जपणारा असा एखादा कार्यक्रम अनोखाच आहे. सावंतवाडी आणि वेंगुर्ले या तालुक्यांमधील आरवलीच्या परिसरातील त्यांच्या चाहत्यांनी वर्षभर दळवींच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. साहित्य प्रेरणा कट्टा ही आभासी संस्था आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे या शतकमहोत्सवी ग्रंथालयाने हा उपक्रम राबविला. साहित्य रसिक आणि हे साहित्य जतन करणारी, रसिकांना ते पुरविणारी ग्रंथालयासारखी संस्था विधायक हेतूने एकत्र आली की किती उत्तम आदर्श निर्माण होऊ शकतो, हेच या संस्थांनी दाखवून दिले आहे.