सर्वाधिक उजाड महामार्ग?

अनेक वर्षे रखडलेले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे. पुढच्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होऊन संपूर्ण महामार्ग खुला होईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. महामार्गाचे काम यथावकाश पूर्ण होईलच, पण महामार्गाची निर्मिती करण्यापूर्वी हा महामार्ग हरित महामार्ग होईल असे दिलेले आश्वासन मात्र पूर्ण होण्याबाबत शंका आहे. उलट कोकणासारख्या निसर्गसंपन्न भागातील हा महामार्ग देशभरातील सर्वांत उजाड महामार्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महामार्गावरचे वनीकरण

आता महामार्गाच्या दुतर्फा आणि मधोमध कोकणाच्या वातावरणाला पूरक अशी झाडे लावली गेली पाहिजेत. तसे सुरुवातीपासूनच सांगितले गेले आहे. सातत्याने त्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत. उद्योजक आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे वनीकरण करून घ्यायचे असेल, तर ते स्थानिक स्वरूपातच होणार हे नक्की. त्यासाठी कोणताही कंत्राटदार नेमला जाणार नाही. म्हणूनच स्थानिक जातीची झाडे निवडणे आणि त्यांची लागवड करणे तसेच त्यांची जोपासना करणे ही कोकणवासीयांचीच जबाबदारी आहे. अन्यथा हा महामार्ग कोकणातून जाणारा तरीही उजाड महामार्ग ठरणार आहे.