पाणीटंचाईची परंपरा

प्रत्येकाने आपल्या पाण्याची गरज भागवली तर नेते म्हणून त्यांची किंमत कमी होईल ही भीती त्यांना वाटते. म्हणूनच पाण्याच्या टंचाईची रत्नागिरी जिल्ह्याची परंपरा कायम राखण्याकडेच लोकप्रतिनिधी आणि शासनाचाही नेहमीच कल राहतो. नेमेचि येणाऱ्या पावसाळ्याप्रमाणे नेमेचि उन्हाळा येणार आणि पाणीटंचाई कायम राहणार आहे. पावसाचे पाणी साठविले पाहिजे, हे पालुपद मात्र न चुकता, न विसरता आळविले जाणार आहे. यावर्षीचा उन्हाळा तरी त्याला अपवाद कसा ठरेल?

भूजल संपविण्याचा उपक्रम

कृषी पंपांसह जमिनीतील पाणी शोषून घेण्यासाठी अनेक योजना, कर्ज योजना आणि अनुदान तसेच निधी मिळतो. मात्र पावसाचे पाणी साठविण्यासाठी अशी कोणतीही योजना नाही. अल्पदरातील कर्ज नाही किंवा कोणतेही अनुदानही मिळत नाही, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकही पाणी साठवण्याकरिता काहीतरी करू शकेल. एकही शासकीय कार्यालयही पावसाचे पाणी स्वतः साठवत नाही. अधिकारी मात्र पावसाच्या पाण्याची साठवण करणे किती उपयुक्त आहे, हे लोकांना सांगतात. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण या म्हणीचा आणखी दुसरा कोणता दाखला हवा?