भाग्य अपुले अपुल्या हाते…

जे उमेदवार उभे आहेत, त्यापैकी त्यातल्या त्यात योग्य कोणता, आपला लोकप्रतिनिधी ठरायला लायक उमेदवार कोणता, हे तरी मतदार नक्की ठरवू शकतो. आपणच मतदारांचे भाग्यविधाते आहोत, असे या प्रत्येक उमेदवाराने आतापर्यंत अनेकदा प्रचारातून सांगितले आहे. पण त्यातही खरोखरीच कोण भाग्यविधाता ठरू शकतो, याचा निर्णय मतदारांनाच घ्यावा लागणार आहे. ते त्यांनी ठरवायला हवे. आवर्जून मतदान करणे हाच तूर्त तरी त्यावरचा एकमेव उपाय आहे. तो योजायला हवा.

प्रबोधन आणि मनोरंजन

दर पाच वर्षांनी येणारी निवडणूक विकासाचे अधिकाधिक चांगले टप्पे पार करण्याचे एक साधन असते, पण विकासाच्या या मुद्द्याकडे सारेच प्रमुख उमेदवार दुर्लक्ष करताना दिसतात. त्यांच्या त्यांच्या पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झालेले असतात, पण तो एक उपचार असतो. विकासाचे मोठे स्वप्न त्या जाहीरनाम्यामध्ये छापले गेलेले असते. मी स्वतः काय करणार आहे, त्या जाहीरनाम्याच्या दृष्टिकोनातून माझी जबाबदारी कोणती आहे, मतदारांनी मी काय देऊ शकतो, राज्याच्या आणि देशाच्या भल्यासाठी मी काय करू शकतो हे सांगण्याकडे उमेदवार सोयीस्कर दुर्लक्ष करत असतात.