रत्नागिरी : सागरी सीमा मंचातर्फे दि. १९ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत दक्षिण रत्नागिरीतील रत्नागिरी व राजापूर तालुक्यांमधील एकूण २० विविध समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छ सागर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
समुद्र हा कोकणच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. रत्नागिरी जिल्ह्याची अर्थव्यवस्था, मच्छीमारी, पर्यटन, स्थानिक संस्कृती आणि हजारो कुटुंबांची उपजीविका समुद्राशी जोडलेली आहे. त्यामुळे समुद्र आणि समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणे ही केवळ पर्यावरणाची बाब नसून सामाजिक, आर्थिक आणि भविष्यातील पिढ्यांशी संबंधित जबाबदारी आहे. याच भूमिकेतून सागरी सीमा मंचाच्या पुढाकाराने विविध सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, मच्छीमार, युवक आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छ सागर अभियान राबविण्यात येत आहे.
सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या शनिवारी जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने कोस्ट गार्ड व भारत सरकारच्या संबंधित मंत्रालयांच्या माध्यमातून देशभर किनारपट्टी स्वच्छता अभियान राबविले जाते. सन 2022 पासून सीमा जागरण मंचाच्या माध्यमातून देशभर हा उपक्रम राबविला जात असून, कोकण प्रांतात सागरी सीमा मंच व सहयोगी संस्था या अभियानाला व्यापक जनसहभागाचे स्वरूप देत आहेत.
‘स्वच्छ सागर’ म्हणजे केवळ समुद्रकिनाऱ्यावर पडलेला कचरा उचलणे नव्हे. कचरा समुद्रात जाण्यापूर्वीच रोखणे, त्याचे योग्य वर्गीकरण करणे, पुनर्वापर व पुनर्चक्रण वाढवणे आणि नागरिकांच्या दैनंदिन वर्तनात सकारात्मक बदल घडवणे, ही या अभियानाची मूळ संकल्पना आहे. समुद्र स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ शासनाची किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेची नाही. मच्छीमार, स्थानिक नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, पर्यटक, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि सामाजिक व पर्यावरण संस्थांनी एकत्र येऊन ही जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे.
रत्नागिरी शहरातील भाट्ये समुद्रकिनारी 19 सप्टेंबर रोजी कोस्ट गार्ड व शासनाच्या विविध विभागांच्या सहभागातून अभियान स्वतंत्रपणे राबविण्यात येणार आहे. यात मंचाचा सक्रिय सहभाग असेल, तर सागरी सीमा मंच विविध संस्थांच्या गौरी-गणपती विसर्जनानंतरच्या दुसऱ्या दिवशी, २० सप्टेंबर रोजी मांडवी किनाऱ्यावर स्वच्छता अभियान होणार आहे.
तसेच अनंतचतुर्दशीनंतर २६ सप्टेंबर रोजी पांढरासमुद्र, नांदिवडे व संदखोल (जयगड), वरवडे, मालगुंड, गणपतीपुळे, आरे, काळबादेवी, मिऱ्या-शिवलकरवाडी, मिऱ्या-पाटीलवाडी, कुर्ली, वायंगणी, रनपार, गणेशगुळे, पूर्णगड, गावखडी तसेच राजापूर तालुक्यातील वेत्ये, कशेळी, आंबोळगड आणि नाटे या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायती, विविध महाविद्यालये, शाळा, सामाजिक संस्था व मंडळांच्या सहभागातून एकूण 20 विविध समुद्रकिनाऱ्यांवर या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानासाठी समुद्र स्वच्छतेच्या विषयात काम करणाऱ्या समाजातील विविध व्यक्तींची समिती स्थापन करण्यात आली असून या स्वच्छता अभियान समिती प्रमुख संजीव लिमये, स्वच्छता अभियान सहप्रमुख सुहास ठाकूरदेसाई आहेत. याबरोबरच अभियान राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक समुद्रकिनाऱ्यासाठी ‘किनारा (बीच) प्रमुख’ निश्चित करण्यात आले आहेत.
“कचरा समुद्रात जाऊ देऊ नका” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. केवळ एक दिवस किनारा स्वच्छ करून हा प्रश्न सुटणार नाही. कचरा समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी नागरिकांच्या सवयींमध्ये बदल घडवणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, सिंगल व एकूणच प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि समुद्रकिनाऱ्याबाबत आपली सामूहिक जबाबदारी ओळखणे ही या अभियानाची पुढील दिशा आहे.
Follow Kokan Media on Social Media

