विधानसभा प्रवास योजना का नसावी?

विकासाची नेमकी कोणती कामे राज्य सरकारने, शिवसेनेने केली, हे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेनेचे आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांचे मावळते सदस्य तसेच सर्व लोकप्रतिनिधींना यांना आपापल्या मतदारांशी संपर्क साधायला हरकत नाही. केवळ भाजपवर चौफेर टीका हाच निवडणुकीच्या काळात प्रचाराचा मुख्य आणि एकमेव मुद्दा ठेवण्याऐवजी विकासकामे सातत्याने लोकांपर्यंत नेली, तर त्याचा अधिक फायदा होऊ शकेल. त्यासाठी लोकसभा प्रवास योजनेसारखी विधानसभा प्रवास योजना आखायला काय हरकत आहे?

जाब विचारणारी यंत्रणा हवी

लोकांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी खासदारांना निवडून दिले जाते. निषेधासाठी सभागृहातील कामकाजावर बहिष्कार टाकून बाहेर पडण्यासाठी नव्हे. निषेध करणे समजू शकते, पण अगदी प्राथमिक शाळेतल्या द्वाड मुलांप्रमाणे कागद भिरकावणे, फाडून टाकणे, ठोकळे फेकणे, सभापतींच्या अंगावर धावून जाणे, आरडाओरडा करणे हे खासदारांचे काम नक्कीच नाही. पण याचा जाब विचारू शकणारी कोणतीही यंत्रणा लोकशाहीमध्ये नाही, ही दुर्दैवी बाब आहे.