मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात येणार असलेली कोकण रेल्वेची रो-रो सेवा कोकणवासीयांसाठी अत्यंत अव्यवहार्य ठरणार आहे. कोकणातील अनेक प्रवाशांच्या दृष्टीने सध्या चालवण्यात येणाऱ्या प्रवासी गाड्या कोकणवासीयांपेक्षा दक्षिणेकडे जाणाऱ्या राज्यातील प्रवाशांसाठी सोडल्या जातात, असा आरोप केला जातो. कारण जलद आणि अतिजलद गाड्यांचे खूपच कमी थांबे कोकणातील स्थानकांवर आहेत. त्याच पद्धतीने मोटारींची वाहतूक करणारी ही रो-रो सेवासुद्धा कोकणवासीयांसाठी कोणत्याही दृष्टीने व्यवहार्य ठरण्याची शक्यता नाही.