बदल्यांचे धोरण आणखी सुधारावे

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या यापुढे केल्या जाणार नसल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील पत्रकार परिषदेत दिली. हा अत्यंत चांगला निर्णय आहे. मुळात बदल्या करूच नयेत, अशा आशयाचे संपादकीय कोकण मीडियाच्या यापूर्वीच्या एका अंकात लिहिले होते. हव्यात कशाला बदल्या, या मथळ्याच्या त्या संपादकीयामध्ये सुचविलेला एक बदल राज्य शासनाच्या निर्णयामुळे प्रत्यक्षात आला आहे.

हव्यात कशाला बदल्या?

माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या होत नाहीत. कारण ते एखाद्याच संस्थेत काम करू शकतात. विविध जिल्ह्यांमध्ये शाळा असलेल्या मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये बदली होत असली तरी बहुसंख्य शाळा स्थानिक संस्था चालवितात. त्यामध्ये शिक्षक कोणत्याही भागातून येऊन रुजू झाले, तरी त्यांना नोकरीच्या अखेरपर्यंत तेथेच थांबावे लागते. हीच पद्धत प्राथमिक शाळांच्या बाबतीतही अमलात आणायला हवी. त्यामुळे अनेक गोष्टी साध्य होऊ शकतील.