किती जणांचे स्थलांतर रोखले गेले?

मंडणगडमधील नव्या औद्योगिक वसाहतीची घोषणा करण्यात आली आहे. या वसाहतीमुळे स्थलांतर रोखले जाणार असल्याचा मुद्दा योगेश कदम यांनी मांडला आहे. हा मुद्दा किती हास्यास्पद आहे, हे सांगण्याची गरजच नाही. तसे नसेल तर आजपर्यंत झालेल्या नवनव्या उद्योगांच्या घोषणा, त्यांची अंमलबजावणी, त्याद्वारे उभारले गेलेले नवे उद्योग आणि तेथे रोजगार मिळाल्यामुळे किती प्रमाणात बेरोजगारी कमी झाली याचीही मोजदाद व्हायला हवी. कोकणातून मुंबई-पुण्याकडे होणारे स्थलांतर किती प्रमाणात रोखले गेले, याची टक्केवारीही त्यातून उघड होऊ शकेल.

मंडणगडमध्ये एक हजार एकर क्षेत्रावर होणार एमआयडीसी; आंबेडकर जयंतीदिनी राज्यमंत्री कदम यांची घोषणा

आंबडवे : रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव. आज (१४ एप्रिल) सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने डॉक्टर आंबेडकर यांची जयंती आंबडवे गावी साजरी करण्यात आली.