आजगाव (ता. सावंतवाडी) : थोर साहित्यिक कै. जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षारंभाचा कार्यक्रम येत्या १४ ऑगस्ट रोजी आरवली (ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) येथे आयोजित करण्यात आला आहे.
कै. दळवी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. आजगाव (ता. सावंतवाडी) येथील साहित्य प्रेरणा कट्टा दरवर्षी १४ ऑगस्टला त्यांचा जन्मदिन साजरा करतो. अलीकडे तो आरवली (ता. वेंगुर्ले) येथे त्यांच्या मूळ घरी दळवी कुटुंबीयांच्या मदतीने साजरा केला जातो. यावर्षीही तो साजरा केला जाणार असून तेथे साहित्य प्रेरणा कट्ट्याचा ४६ वा मासिक कार्यक्रम फोंडा (गोवा) येथील सृजन संवाद या संस्थेसह दळवींच्या मूळ घरी आरवलीतच आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ होत आहे. दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सृजन संवादचे अध्यक्ष अनुप प्रियोळकर भूषविणार असून प्रमुख वक्त्या ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी असणार आहेत.
या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी जरूर उपस्थित राहावे, असे आवाहन आजगाव साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर आणि सचिन दळवी यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड







