Description

मातीचा जातीचा शेतकरी
लेखक : जयंत फडके, जांभूळआड, ता. जि. रत्नागिरी
प्रकाशक : सत्त्वश्री प्रकाशन, रत्नागिरी
पृष्ठे : १३२
मूल्य : २५० रुपये
…………..
पुस्तकाविषयी लेखकाचे मनोगत…
आपलं जग मांडण्याचा छोटासा प्रयत्न…
कोकण संपन्न, समृद्ध आहे. निसर्गाचं वरदान कोकणाला भरभरून लाभलं आहे. नारळ, सुपारी, आंबा, काजूच्या बागा… भात, नाचणी, कंदपिकं, श्रीधान्यं, फूलशेती… काय होणार नाही कोकणात? विस्तीर्ण समुद्रकिनारा, उशाला सह्याद्री, भरपूर पाऊस, वृक्षवल्लींचं वैविध्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, भाषिक, खाद्यविषयक संपन्नता… किती वर्णन करावं? पण कमालीच्या शहरी आकर्षणाने गावं ओस पडत आहेत. आजपावेतो वृत्तपत्रं, नियतकालिकं, टीव्ही आणि आधुनिक माध्यमांतून आपल्यासमोर खूप यशोगाथा नक्कीच आल्या असतील; पण कोकणाचं वेगळेपण, प्रश्न-समस्या, काळाच्या ओघात निर्माण झालेलं द्वंद्व, कोकणी शेतकऱ्याचा-बळीराजाचा दृष्टिकोन, उत्तरं शोधण्याचा प्रयत्न, शासन-प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून असलेल्या अपेक्षा, दुःख, वेदना आणि आनंदही तशा पोटतिडकीने जगासमोर तितक्या लक्षवेधी प्रमाणात आला नाही. त्या पार्श्वभूमीवर, ‘बोल बळीराजाचे’ सदर हा आपलं जग मांडण्याचा छोटासा प्रयत्न होता… त्याची संधी दिली ‘दैनिक सकाळ’ने. दर आठवड्याला एक लेख लिहिताना त्या त्या वेळच्या सणांचे, ऋतूंचे, शेतीचे संदर्भ आले आहेत. आपण त्या प्रसंगात तिथे असल्याची कल्पना केलीत, तर कोकण अनुभवत वाचनाचा आनंद नक्कीच घेऊ शकाल. या ५० लेखांमध्ये सारे विषय आलेच आहेत असा दावा नाही; पण खूप विषयांना संदर्भासह स्पर्श करण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. हे वर्षभराचं व्रत पूर्ण करण्यात ‘दैनिक सकाळ’चे सर्व सहकारी, माझे अनेक गुरुतुल्य हितचिंतक, कुटुंबीय आणि राज्यभरातल्या वाचकांचा सिंहाचा वाटा आहे… सर्वांचाच ऋणी आहे!
– जयंत गोपाळ फडके
(हे पुस्तक गुगल प्ले बुक्सवर ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहे.)











Reviews
There are no reviews yet.