आंबडवे गावाचे आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल; ‘डिक्की’चा पुढाकार

आंबडवे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) या गावाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. येत्या तीन महिन्यांत त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि उद्योग-व्यवसायांतून हे गाव स्वतःचा आदर्श उभा करील, असा विश्वास ‘डिक्की’चे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी आज (१८ सप्टेंबर) आंबडवे येथे व्यक्त केला.

महामानवाच्या आंबडवे गावातील प्रत्येक कुटुंब होणार आत्मनिर्भर

निसर्ग चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या आंबडवे गावातील नागरिकांना पुन्हा नव्याने स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ (डिक्की), खादी ग्रामोद्योग मंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ (बाटू) या संस्था एकत्र आल्या आहेत. हे गाव दत्तक घेत असल्याची घोषणा ‘डिक्की’चे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी काल (१८ जून) आंबडवे येथे केली. प्रत्येक घरातल्या प्रत्येक हाताला उद्योग, त्यासाठीचा कच्चा माल, निर्मितीचे प्रशिक्षण आणि पक्का माल खरेदीची हमी अशी सर्वांगीण योजना त्यासाठी तयार करण्यात आली आहे.