स्थलांतर रोखणाऱ्याही नोकऱ्या हव्यात

कोकणात कोकणाचे प्रश्न असतील, तसेच विदर्भात विदर्भाचे म्हणून काही प्रश्न असतील, मराठवाड्याचेही काही प्रश्न असतील. सर्वच ठिकाणी स्थानिक उद्योगांना, लघुउद्योगांना गरज असलेल्या तरुणांची उपलब्धता करून देण्यासाठीही उद्योग विभागाने तसे अभियान राबवायला हवे. मोठ्या उद्योगांप्रमाणेच या छोट्या उद्योगांनाही कामगार-कर्मचाऱ्यांची गरज असते. ती स्थानिक स्वरूपातच भागविली गेली, तर स्थलांतर रोखले जाईलच, पण त्याचबरोबर त्या त्या स्थानिक उद्योगांची आणि पर्यायाने त्या विभागाचीही भरभराट होईल. हा समन्वय साधला जाणे आवश्यक आहे.

महाजॉब्ज पोर्टलचे लोकार्पण; नोकरी शोधणारे कामगार आणि मनुष्यबळ शोधणारे उद्योजक यांच्यातील दुवा

मुंबई : राज्यातील नागरिकांना रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी साह्यभूत ठरेल, अशा महाजॉब्ज पोर्टलचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (सहा जुलै) मुंबईत झाले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह दिलीप वळसे-पाटील, नवाब मलिक आणि अदिती तटकरे आदी या वेळी उपस्थित होते.