रत्नागिरी : बळीराजा शेतकरी संघ आणि रत्नागिरी जिल्हा काँग्रेसतर्फे आगळीवेगळी पोटापुरती भाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तिचा प्रारंभ उद्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणार आहे.
उद्या (दि. २६ एप्रिल) अक्षय्य तृतीया आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी शेतकरी, कष्टकरी, गृहिणी आपल्या शेतात, घरपरड्यात, गच्चीवर, कुंडीत, सांडपाण्यावर वेलभाज्या, फळभाज्या, पालेभाज्या, वाल, चवळीसारख्या कडधान्य भाज्यांची बियाणी लावण्याचा मुहूर्त करतात. पावसाळ्याच्या सुरवातीला भाज्यांचे उत्पादन कमी असते आणि बाजारात भाज्यांचे दर वाजवीपेक्षा जास्त असतात, तेव्हा ते आर्थिकदृष्ट्याही परवडत नाही. विषारी पेस्टिसाइड औषधांची फवारणी केलेल्या त्या भाज्या आरोग्याला धोकादायकही असतात. तेव्हा घरी पिकविलेल्या भाज्या उपयुक्त ठरतात. त्याच अनुषंगाने बळीराजा शेतकरी संघ आणि रत्नागिरी जिल्हा काँग्रेसतर्फे पोटापुरती भाजी ही अभिनव स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.
ध्या लॉक डाऊनचा काळ आहे. या काळाचा सदुपयोग करून आपल्याच हातांनी लावलेली ताजी भाजी खाता येईल आणि आर्थिक बचतही बऱ्याच प्रमाणात होईल. शेतकऱ्यांना भाजी आणि अन्य पिके घेताना किती कष्ट पडतात, किती निगा राखावी लागते, सर्वसाधारणपणे खर्च किती येतो, शेतकऱ्याला मिळणारा भाव योग्य की अयोग्य या साऱ्या गोष्टींची माहितीही होईल. त्यानिमित्ताने कुटुंबीयंची स्वानुभवाची कार्यशाळाही होईल. मशागतीचे तंत्र अवगत होईल.
त्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी बियाणे घातल्यापासून भाजीपाला पूर्ण वाढेपर्यंत लागलेला कालावधी, त्याला घातलेली सेंद्रिय खते, औषधे या सर्वांची नोंद ठेवायची आहे. त्यानंतर स्पर्धकाच्या रोपांची संख्या आणि रोपामागे उत्पादन (क्षेत्र नाही) याची सरसरी काढून विजेता घोषित केला जाणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्वतःची जमीनच पाहिजे, अशी अट नाही. मात्र मेहनत स्वतःच घ्यावी लागेल. नोकरांकरवी काम करून घेतलेले चालणार नाही. बळीराजा शेतकरी संघाचे आणि काँग्रेसचे सदस्य स्पर्धेचे परीक्षण करतील. भाजीपाला पाहून, आपल्या प्रत्यक्ष कामाचा अनुभवावर मुलाखात घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून तीन स्पर्धक विजयी ठरविले जातील.
प्रत्येक तालुक्यात अनुक्रमे एक हजार रुपये, ७५० रुपये आणि ५०० रुपये अशी तीन बक्षिसे आणि प्रशस्तीपत्र दिले जाईल. प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेचा प्रारंभ उद्या (दि. २६ एप्रिल) होईल. स्पर्धकांनी येत्या १ मेपर्यंत नोंदणी करावयाची असून कोणता भाजीपाला, फळभाजी, वेलभाजी, कडधान्य भाजी, किती क्षेत्रात, कोणकोणती, किती रोपे घरपरड्यात, कुंडीत, गच्चीवर, शेतात, सांडपाण्यावर लावली आहेत त्याचा तपशील, नाव, गाव, शहर पूर्ण पत्ता कळवावा. स्पर्धेचा कालावधी १ जुलैपर्यंत म्हणजे दोन महिने पाच दिवसांचा राहील. स्पर्धकांनी अशोकराव जाधव, मु. पो. कोसुंब, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी ४१५८०४ (संपर्क क्र. ९४२३२९३४९४, ७३५०३४८२९४, ९९७५३२२४११०) या पत्त्यावर प्रवेशिका पाठवाव्यात. स्पर्धेचे बक्षीस वितरण रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. विजयराव भोसले आणि बळीराजा शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेशकाका जगताप यांच्या हस्ते होणार आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media