दापोली : ख्यातनाम शायर, कवी, गझलकार बदीउज्जमा खावर यांच्या तिसाव्या स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेकरिता कविता पाठविण्याची मुदत येत्या २० सप्टेंबरपर्यंत असली, तरी पुरेसा प्रतिसाद मिळाल्यामुळे संकेत क्रमांक दिलेल्या कवींव्यतिरिक्त इतरांनी यापुढे कविता पाठवू नयेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दापोलीतील युवा फाउंडेशन, दापोली साहित्य कट्टा आणि मित्रांच्या कविता यांच्या संयुक्त विद्यमाने पं. बद्दिउज्जमा खावर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा ही निःशुल्क आहे. स्पर्धेकरिता येणाऱ्या कवितांचे परीक्षण योग्य तऱ्हेने व्हावे, यासाठी कविता पाठविण्यापूर्वी संपर्क साधणाऱ्या कवींना संकेत क्रमांक दिले जात होते. स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून मिळालेला अनपेक्षित आणि उदंड प्रतिसाद पाहता नियोजनाच्या दृष्टीने आता संकेत क्रमांक देण्याची प्रक्रिया थांबवली आहे. आता फक्त दिलेल्या संकेत क्रमांकाच्या कविता २० सप्टेंबरपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. इतरांनी यापुढे संकेत क्रमांकासाठी संपर्क साधू नये, असे आयोजकांनी कळविले आहे.
स्पर्धेचा निकाल खावर यांच्या स्मृतिदिनी २७ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
