Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

शेतीच्या नुकसानाची माहिती ऑनलाइन अर्जाद्वारे पाठवा; रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Advertisements

रत्नागिरी : ऑक्टोबर महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचा पंचनामा करण्यास शासकीय यंत्रणा अद्याप पोहोचली नसेल, तर शेतकऱ्यांनी स्वतः ऑनलाइन अर्ज भरून प्रशासनाकडे माहिती पाठवावी, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्याच्या अनेक भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्हाही त्याला अपवाद नाही. रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी या प्रमुख पिकांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित शासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत; मात्र हे नुकसान मोठ्या क्षेत्रावर झाले असल्यामुळे काही भागांत शासकीय यंत्रणा अद्याप पोहोचली नसल्याची शक्यता आहे. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी https://forms.gle/rYEhn79dbsStLo336 या गुगल फॉर्मच्या लिंकवर आपल्या शेतीच्या झालेल्या नुकसानाची माहिती भरून द्यावी, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. त्या फॉर्ममधील माहितीची दखल घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version