शाळांनीच घ्यावेत छंद वर्ग

ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेच्या शाळेच्या सहकार्यातून नाचणे येथील छंद वर्ग चालविला जात असल्यामुळे तो पूर्णपणे मोफत आहे. ग्रामस्थ आणि काही देणगीदार यांच्या मदतीतून हा वर्ग चालविला जातो. असा छंद वर्ग चालविणारी नाचणे ग्रामपंचायत बहुधा राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत असावी, पण रत्नागिरी जिल्ह्यातील मात्र जिल्हा परिषदेची ती एकमेव शाळा आहे. नाचणे शाळेचे हेच उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून जिल्हा परिषदेच्या शाळांनीच आता सुट्टीतील छंद वर्गांचे आयोजन करायला हवे.

प्रत्येक गाव व्हावे पुस्तकांचे गाव

संपूर्ण कोकणातील प्रत्येक गाव पर्यटनस्थळ आहे, असे म्हटले जाते. तसेच निसर्गसौंदर्य प्रत्येक गावाला मिळाले आहे. मात्र पर्यटक प्रत्येक गावाला भेट देईलच, अशी शक्यता नाही. ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ असलेली अनेक गावे कोकणात आहेत. या गावांना पर्यटक भेटी देत असतात. पण त्या स्थळाविषयीची माहिती त्यांना एकत्रितरीत्या उपलब्ध होत नाही. सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात ही माहिती पर्यटक वेगवेगळ्या माध्यमांमधून मिळवत असतात. मात्र ती सर्व माहिती अचूक असेलच असे नाही. मालगुंड हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून जाहीर झाल्यानंतर आता या गावाच्या पुढाकाराने ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे.

किती जणांचे स्थलांतर रोखले गेले?

मंडणगडमधील नव्या औद्योगिक वसाहतीची घोषणा करण्यात आली आहे. या वसाहतीमुळे स्थलांतर रोखले जाणार असल्याचा मुद्दा योगेश कदम यांनी मांडला आहे. हा मुद्दा किती हास्यास्पद आहे, हे सांगण्याची गरजच नाही. तसे नसेल तर आजपर्यंत झालेल्या नवनव्या उद्योगांच्या घोषणा, त्यांची अंमलबजावणी, त्याद्वारे उभारले गेलेले नवे उद्योग आणि तेथे रोजगार मिळाल्यामुळे किती प्रमाणात बेरोजगारी कमी झाली याचीही मोजदाद व्हायला हवी. कोकणातून मुंबई-पुण्याकडे होणारे स्थलांतर किती प्रमाणात रोखले गेले, याची टक्केवारीही त्यातून उघड होऊ शकेल.

सरकारी नोंदी होतील कदाचित, पण…

शासकीय यंत्रणेमार्फत पुरविले जाणारे टँकर अत्यंत तुटपुंजे असतात. मोठ्या प्रमाणावर खासगी जलस्रोतांमधून खासगी विहिरींचे मालक आणि टँकरचालक लोकांची पाण्याची गरज भागवत असतात. हे पाणी पिण्यायोग्य आहे का, याची कोणतीही नोंद शासकीय दप्तरात होत नाही. किती प्रमाणात खासगी टँकरद्वारे किती नागरिकांना पाणी पुरविले गेले, याची नोंद कधीही मिळत नाही. त्यामुळे एखाद्या तालुक्यात किंवा एखाद्या विभागात पाण्याची टंचाई नाही, असे टँकर न पुरविण्याच्या निकषानुसार जाहीर असले तरी त्या भागात पाण्याची टंचाई नसतेच असे नाही.

मालवणी संस्कृतिसंवर्धनाचा प्रयोग

विविध बोलीभाषा हेही मराठीचे महत्त्वाचे स्रोत आहेत. या भाषा संवर्धित झाल्या, तरच प्रमाण मराठी भाषेचा अभिजात दर्जा टिकवून ठेवायला मदत होणार आहे. या दृष्टीने बोलीभाषांचे संवर्धनही अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी त्या त्या बोलीभाषामधील कार्यकर्ते दीर्घ काळापासून कार्यरत आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या प्रयत्नांना आणखी बळ प्राप्त झाले आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा या साहित्यभूमीमध्ये झालेल्या मालवणी साहित्य संमेलनाकडे पाहायला हवे.

माझी वसुंधरा अभियान

प्रत्येकाने आपापल्या पातळीवर पर्यावरणाच्या रक्षणाचा प्रयत्न करायला हवा. शहरे आणि ग्रामीण भागामध्ये आयोजित करण्यात आलेले माझी वसुंधरा अभियान त्यासाठी उपयुक्त आहे. मात्र त्यातील उपक्रम केवळ अभियानाच्या आणि स्पर्धेच्या वर्षापुरते राबवून काहीही उपयोग नाही. या उपक्रमांचे महत्त्व पटले असेल तर हे उपक्रम दैनंदिन जीवनाचाच एक भाग झाले पाहिजे. तरच अभियान राबविण्यात काही अर्थ आहे.