कोकणच्या पर्यटनवाढीसाठी तातडीने निर्णय व्हावेत असे विषय

जागतिक पर्यटन दिन विशेष

कोकणात पर्यटन विकासाकडे लक्ष दिले तर संपूर्ण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळण्याची ताकद कोकण प्रदेशात आहे. त्याविषयी २७ सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने केलेले मुक्त चिंतन.

…………….

पर्यटन हाच कोकणाच्या समृद्धीचा महत्त्वाचा भाग आहे, हे वारंवार सांगितले जाते. त्यादृष्टीने काही मुद्दे जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने सुचवावेसे वाटतात.

मुंबई ते गोवा स्वराज्य भूमी कोकण महामार्ग वर्षभरात पूर्ण व्हावा. तो खड्डेमुक्त आणि दर्जेदार असावा.

पुढील दोन-तीन वर्षांत आता अस्तित्वात असलेला अलिबाग ते वेंगुर्ले सागरी महामार्ग दोन पदरी राहावा. तो दर्जेदार बनवावा. जेथे अरुंद आहे तेथे तो रुंद व्हावा. महामार्ग गर्दीच्या गावातून जातो, तेथे बायपास करावेत. उरलेले खाडीपूल पूर्ण करावेत.

कोकणात ज्या गावांमध्ये पर्यटक येतात, अशी सत्तर-ऐंशी प्रमुख पर्यटनाची गावे आहेत. या गावांमध्ये चोवीस तास वीजपुरवठा, गावात जाण्यासाठी चांगला दुपदरी रस्ता, पार्किंगची सुविधा, स्वच्छतागृहे, सुशोभीकरण मूलभूत सुविधा या गावांमध्ये निर्माण कराव्यात.

ऊस, कापूस, द्राक्ष, वायनरी, साखर कारखाने अशा ग्रामीण उद्योगांसाठी जशी महाराष्ट्रातील अन्य भागांमध्ये आजपर्यंत मदत शासनाने केली, तशी कोकणामध्ये स्थानिक तरुणांना हॉटेल, रिसॉर्ट, होम स्टे, कृषी पर्यटन, थीम पार्क, वॉटर स्पोर्ट्स, साहसी पर्यटन असे पर्यटनाचे छोटे-छोटे प्रकल्प उभारण्यासाठी प्रकल्प खर्चाच्या ३० ते ४० टक्के सब्सिडी द्यावी. दहा वर्षे अशी सब्सिडी पहिल्या १० हजार उद्योगांसाठी द्यावी, की सब्सिडी फक्त स्थानिक तरुणांना मिळेल. सब्सिडी आणि कर्जमाफीसाठी कोकणी माणूस कधीही सरकारकडे हात पसरत नाही, पण अन्य प्रदेशांना आजपर्यंत मिळाली असेल तर ती सुविधा कोकणाला एकदा मिळणे आवश्यक आहे.

जगभरातून आणि देशभरातून गुंतवणूक आकर्षित करून थायलंडमधील फुकेतप्रमाणे १-२ हजार एकर आकाराची नवीन पंचतारांकित केवळ पर्यटनाची शहरे म्हणजे टुरिझम पार्क किमान प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावरील तालुक्यात एक अशा पद्धतीने अत्याधुनिक पर्यटनाचे शहर विकसित करावे. त्यामुळे लाखो पर्यटक एकाच ठिकाणी राहू शकतील आणि त्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. लाखो रोजगार निर्माण होतील परदेशी गुंतवणूक आकर्षित होईल. परदेशी गुंतवणुकीबरोबरच ते ते व्यावसायिक आपल्या देशातून पर्यटक कोकणात घेऊन येतील. अर्धे दापोली किंवा मालवण एवढ्याच क्षेत्रफळाच्या फुकेतची वर्षाची पर्यटनाची अर्थव्यवस्था पंचवीस हजार कोटी आहे आणि हे सगळे विदेशी पर्यटक असतात. कोकणची क्षमता फुकेतच्या २० पट आहे आणि कोकण फुकेतइतकेच सुंदर आहे.

सह्याद्रीमध्ये अस्तित्वात असलेल्या रस्त्यांना एकत्र जोडून पेणपासून पाचाड, शिवथर घळ, धामणंद, तिवरे, प्रचीतगड, देवरूख, साखरपा, पाचल, वैभववाडी,भिरवंडे, माणगाव खोरे, आंबोली पायथा ते दोडामार्ग असा दोन पदरी छान सह्याद्री इको-टुरिझम महामार्ग विकसित करावा.

सागरी महामार्ग आणि सह्याद्री महामार्ग आता अस्तित्वात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जागा घ्याव्या लागणार नाहीत. त्यामुळे जागा घेण्यासाठी जो भरपूर निधी लागतो, त्याची आवश्यकता नाही.

संपूर्ण सह्याद्रीमध्ये होम स्टे, कृषी पर्यटन, इको-टुरिझम, साहसी पर्यटन, जैवविविधता निसर्ग पर्यटन, बर्ड वॉचिंग वाइल्डलाइफ टुरिझम, मेडिकल आणि हेल्थ टुरिझम, मोठमोठे प्रकल्प न करता इको-टुरिझमचे छोटे छोटे प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या मदतीने विकसित करावेत. याकरिता प्रोत्साहन देणारी सब्सिडीची योजना बनवावी. संपूर्ण सह्याद्रीचा परिसर हिमाचल प्रदेशप्रमाणे माऊंटन टुरिझम, ऐतिहासिक पर्यटन आणि साहसी पर्यटनासाठी विकसित होईल.

पर्यटनाची बांधकामे करताना बांधकामाचे धोरण आणि सहज सोपी नियमावली आणि परवानगीची सिंगल विंडो व्यवस्था आवश्यक आहे.

नियम तोडून विकास व्हावा, हे कुठेच अभिप्रेत नाही. पण धोरण आणि नियम काय, हे एकदा ठरवावे आणि सहजपणे जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर परवानग्या मिळाव्यात. त्याकरिता लोकांना मुंबईतील मंत्रालयात आणि दिल्लीत खेपा घालायला लागू नयेत. कोकणातील लोक नियमांचे पालन करतात. त्यामुळे त्यांनी या सर्व नियमांचे पालन करून कोकणातील अतिशय शिस्तबद्ध पर्यटनाचा विकास होऊ शकतो.

पर्यटन हाच कोकणातील भविष्यातील विकासाचा प्रमुख विषय आहे. म्हणून कोकणातील व्यवसाय करणाऱ्या तरुणांना मदत करणारा, त्रास न देणारा, पुरेशा संख्येने भरपूर स्टाफ पर्यटन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याजिल्ह्यात द्यावा आणि त्यांना पुरेसे अधिकार द्यावेत. तहसीलदार, प्रांत, महसूलच्या लोकांनी व्यावसायिकांना त्रास देणे आणि लुडबूड करणे थांबवावे.

कृषी पर्यटनाप्रमाणे सागरी पर्यटन, सह्याद्री पर्यटन, साहसी पर्यटन, निसर्ग पर्यटन, एरो स्पोर्ट्स अशा सर्व प्रकारच्या पर्यटनाचे धोरण, नियम, परवानग्या निश्चित कराव्यात आणि सहजपणे परवानग्या मिळाव्यात. सर्व नियमांचे पालन होईल आणि अतिशय शिस्तबद्ध पर्यटन उद्योगाचा विकास होईल.

सागरी पर्यटन महामार्ग, सह्याद्री पर्यटन महामार्ग, प्रमुख पर्यटनाच्या गावात आणि पर्यटन स्थळावर मूलभूत पर्यटनाच्या सुविधा आणि रस्ते, स्थानिक तरुणांना प्रोत्साहन देणाऱ्या
सब्सिडी आणि सवलतीच्या योजना हे सर्व मिळून पुढच्या पाच वर्षांमध्ये २५-३० हजार कोटी रुपयांचा खर्च येईल. एक चारपदरी महामार्ग असताना दुसरा ७० हजार कोटीचा एक्स्प्रेस हायवे बनवण्यापेक्षा आहे तो कोकण महामार्ग दर्जेदार बनवावा, त्यालाच एक्स्प्रेस, सुपर एक्स्प्रेस हायवे बनवावे.

कोकणच्या पर्यटनाच्या मूलभूत विकासासाठी २५-३० हजार कोटी रुपये खर्च केले तर किमान एक लाख कोटी रुपयांची कोकणची अर्थव्यवस्था विकसित होईल. लाखो तरुणांना कोकणातच आपल्या तालुक्यात, पंचक्रोशीत नोकऱ्या मिळू शकतील. शासनालासुद्धा जीएसटी, इन्कम टॅक्स आणि अन्य टॅक्सच्या माध्यमातून दरवर्षी दहा हजार कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळायला लागेल. त्यामुळे कोकणातील पर्यटन उद्योगावर २५ ते ३० हजार कोटी रुपये खर्च करणे हा खर्च नसून ती विकासासाठी गुंतवणूक आहे, जी पुढील दहा वर्षांत व्याजासकट सरकारला परत मिळणार आहे. गेली सत्तर वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या कोकण प्रदेशाला हा निधी मिळणे हा कोकणवासीयांचा अधिकार आणि हक्क आहे. त्यामुळे पुढील पाच-दहा वर्षे योग्य दिशेने योग्य धोरण ठरवून योग्य ठिकाणी खर्च केला आणि या प्रक्रियेत कमीत कमी भ्रष्टाचार झाला तर कोकण म्हणजे देशातील सर्वांत समृद्ध प्रदेश ठरेल.

राज्य आणि केंद्र सरकारला हात जोडून विनंती की, हे सर्व पुढच्या काळात कोकणात करावे. आम्ही सर्व कोकणवासीय आपले कायम ऋणी राहू.

  • संजय यादवराव,
    समृद्ध कोकण संघटना
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

  1. खूप छान मुद्दे कव्हर केलेत.प्रत्यक्षात येण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पाठपुरावा हवा.

Leave a Reply