रत्नागिरी : सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीत निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी मृत्यूपूर्वी स्थावर मालमत्तेचे हस्तांतर टाळावे, असे आवाहन कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती अंबरे यांनी केले.
कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मासिक स्नेहमेळावा साईनगर येथील श्री साई मंदिरात उत्साहाने साजरा झाला. त्यावेळी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. त्यांनी मालमत्ता हस्तांतर कायद्याची माहिती दिली. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मृत्यूपूर्वी स्थावर मालमत्तेचे हस्तांतर टाळण्याचे आवाहन केले.
यावेळी एसटीचे सेवानिवृत्त आगारप्रमुख दिलीपराव साळवी यांनी सुरेल आवाजात श्रीरामाचे भजन सादर करून भक्तिरसात दंग केले. त्यानंतर जानेवारी महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांना शुभेच्छापत्रे, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्यामसुंदर सावंत – देसाई यांनी स्वागत करून महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या मनोहारी मनो युवा या मासिक मुखपत्रातून ज्येष्ठांसाठी प्रकाशित होणाऱ्या आरोग्य आनंदी वृद्धत्व शासकीय योजनेची माहिती दिली. यावेळी त्यांनी केलेल्या मासिकाचे वर्गणीदार होण्याच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सत्कारमूर्ती शांताराम देशपांडे, सौ. विनया वसंत पटवर्धन, डॉक्टर मनोहर चांडगे, प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर कासेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिवकृपा सहकारी पतपेढीच्या रत्नागिरी शाखेचे व्यवस्थापक नितीन भोसले यांनी शिवकृपा पतपेढीच्या ज्येष्ठांसाठी असलेल्या आकर्षक गुंतवणूक योजनांची माहिती दिली.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र कदम, कोषाध्यक्ष मुकुंद जोशी, सहकार्यवाह सुधाकर देवस्थळी, वसंत पटवर्धन, शुभांगी भावे, सौ. सुवर्णा चव्हाण, सहकार्यवाह श्रीमती वंदना कोतवडेकर, श्रीमती वृषाली घाणेकर, नारायण नानिवडेकर. आदी उपस्थित होते. कार्यवाह सुरेश शेलार यांनी आभार मानले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

