रत्नागिरी : येथील केजीएन सरस्वती ट्रस्ट आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे येत्या ५ आणि ६ जानेवारीला प्रथमच दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मृति व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
परिचित शब्दांपाठचा वेगळा अर्थ, वेगवेगळ्या घटनांचा अन्वयार्थ, वास्तवातील, आत्तापर्यंत न जाणवलेला गूढार्थ उलगडून सांगण्यासाठी ही नवी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. ही व्याख्यानमाला समाजाला आरसा दाखवणारी, वैचारिक वारसा जोपासणारी आणि रत्नागिरीच्या सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू ठरणारी असेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


येत्या ५ जानेवारी रोजी व्याख्यानमालेचा प्रारंभ होईल. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राजकारण, समाजकारणाचे अभ्यासक आणि प्रसिद्ध वक्ते अनय जोगळेकर अस्वस्थ वर्तमान या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत. दुसऱ्या दिवशी, मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून ६ जानेवारी रोजी प्रसिद्ध विचारवंत, लेखक, प्रवचनकार, राष्ट्रीय कीर्तनकार डॉ . सच्चिदानंद शेवडे आपल्या ओघवत्या अभ्यासपूर्ण शैलीत माझा मऱ्हाटीचा बोलू कवतिके l परि अमृतातेही पैजा जिंके ll या विषयावर व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफणार आहेत.
दोन्ही व्याख्याने सायंकाळी पाच वाजता रत्नागिरीत झाडगाव नाका येथील राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार आहेत. त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केजीएन सरस्वती ट्रस्ट आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

