भारतीय जनता पक्षातून काँग्रेसकडे गेलेले आणि तेथे प्रदेशाध्यक्षपद भूषविलेले नाना पटोले आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध झाले होते. त्यांचा बेतालपणा इतका वाढला होता की त्यांना अलीकडे कोणीही गांभीर्याने घेत नव्हते. काँग्रेसच्या वरिष्ठांनी मात्र या बेतालपणाची दखल घेतली आणि प्रदेशाध्यक्षपद हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द केले. पद स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी कोकणातून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला प्रारंभ केला. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांच्या दौऱ्याच्या काळात त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या. पक्ष कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. त्यामध्येच त्यांनी प्रचंड टीकेची हौस भागवून घेतली आणि आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आपण कोणती पातळी गाठणार आहोत, याचे दर्शनच घडविले.