एसटी, खासगी बसमधील प्रवाशांना १४ दिवस राहावे लागेल क्वारंटाइन

रत्नागिरी : राज्य शासनाने करोना प्रतिबंधासाठी गेल्या २१ एप्रिल रोजी जारी केलेल्या आदेशानुसार एसटी तसेच खासगी बसमधील प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. प्रवासी बस थांब्यावर उतरताच त्याच्या हातावर १४ दिवस क्वारंटाइन राहण्याचा शिक्का मारावा, असे आदेशात म्हटले आहे. कोणा प्रवाशाची करोनाविषयक आरटीपीसीआर करावयाची झाल्यास त्याचा खर्च प्रवाशाला करावा लागणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेशासाठी ई-पास नको; पण १४ दिवस होम क्वारंटाइन आवश्यक

सिंधुदुर्गनगरी : करोनाप्रतिबंधक लॉकडाउन शिथिल करण्यासाठी सुरू झालेल्या मिशन बिगीन अगेनअंतर्गत अनेक बाबींमध्ये सूट देण्यात आली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेशासाठी ई-पासची आवश्यकता नाही. मात्र येणाऱ्यांना १४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये राहणे आवश्यक आहे, असे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सवासाठी रत्नागिरीतून सिंधुदुर्गात जाऊ इच्छिणाऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधाचा उद्देश कायम ठेवून गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या आठ ते १५ दिवसांच्या वास्तव्याबाबत शासनाने स्पष्ट निर्णय घेण्याची आणि नियोजन करण्याची चाकरमान्यांनी मागणी केल्यानंतर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली; मात्र चाकरमान्यांचे विलगीकरण १४ दिवसांचे होणार की सात दिवसांचे, संस्थात्मक की गृह विलगीकरण याबाबत अद्यापही शासन आणि प्रशासनाने काहीही स्पष्ट केलेले नाही. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग या आपल्या मूळ जिल्ह्यात उत्सवासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांबाबतचा कोणताच विषय पुढे आलेला नाही.

गृह विलगीकरण सात दिवसांचे करावे; चाकरमान्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी : येत्या गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना गृह विलगीकरण १४ दिवसांच्या ऐवजी सात दिवसांचे करावे, अशी मागणी करणारे निवेदन चाकरमान्यांतर्फे रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.