बदल्यांचे धोरण आणखी सुधारावे

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या यापुढे केल्या जाणार नसल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील पत्रकार परिषदेत दिली. हा अत्यंत चांगला निर्णय आहे. मुळात बदल्या करूच नयेत, अशा आशयाचे संपादकीय कोकण मीडियाच्या यापूर्वीच्या एका अंकात लिहिले होते. हव्यात कशाला बदल्या, या मथळ्याच्या त्या संपादकीयामध्ये सुचविलेला एक बदल राज्य शासनाच्या निर्णयामुळे प्रत्यक्षात आला आहे.

भूजल संपविण्याचा उपक्रम

कृषी पंपांसह जमिनीतील पाणी शोषून घेण्यासाठी अनेक योजना, कर्ज योजना आणि अनुदान तसेच निधी मिळतो. मात्र पावसाचे पाणी साठविण्यासाठी अशी कोणतीही योजना नाही. अल्पदरातील कर्ज नाही किंवा कोणतेही अनुदानही मिळत नाही, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकही पाणी साठवण्याकरिता काहीतरी करू शकेल. एकही शासकीय कार्यालयही पावसाचे पाणी स्वतः साठवत नाही. अधिकारी मात्र पावसाच्या पाण्याची साठवण करणे किती उपयुक्त आहे, हे लोकांना सांगतात. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण या म्हणीचा आणखी दुसरा कोणता दाखला हवा?

हव्यात कशाला बदल्या?

माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या होत नाहीत. कारण ते एखाद्याच संस्थेत काम करू शकतात. विविध जिल्ह्यांमध्ये शाळा असलेल्या मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये बदली होत असली तरी बहुसंख्य शाळा स्थानिक संस्था चालवितात. त्यामध्ये शिक्षक कोणत्याही भागातून येऊन रुजू झाले, तरी त्यांना नोकरीच्या अखेरपर्यंत तेथेच थांबावे लागते. हीच पद्धत प्राथमिक शाळांच्या बाबतीतही अमलात आणायला हवी. त्यामुळे अनेक गोष्टी साध्य होऊ शकतील.

प्लास्टिकच्या पर्यायाचा व्यवसाय

प्लास्टिकचा वापर थांबवायला हवा, यात कोणतीच शंका नाही. मात्र अचानक हा वापर थांबविता येणार नाही. त्याला कोणता तरी तितकाच समर्थ पर्याय दिला गेला पाहिजे. हा पर्याय उपलब्ध करणे मोठे आव्हानाचे आहे. हेच आव्हान स्वीकारले गेले पाहिजे. त्याबाबत अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे. पर्यावरणस्नेही प्लास्टिकची निर्मितीही केली जात आहे. मात्र प्रदूषणकारी प्लास्टिकएवढे ते किफायतशीर नाही. सहज परवडणारे नाही. म्हणूनच त्यावर संशोधन आणि त्यातून निर्मिती झाली पाहिजे.

सावरकर विद्यापीठाची गरज

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४० वी जयंती यावेळी मोठ्या अभूतपूर्व उत्साहात साजरी झाली. राज्य शासनाने प्रथमच त्यासाठी पुढाकार घेतला. अलीकडे सामाजिक समरसता आणि हिंदुत्व याबाबत अत्यंत टोकाची मते तयार झाली आहेत. ही टोके विचारांनीच बोथट करता येऊ शकतील. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी सावरकरांचा उल्लेख शतपैलू सावरकर असा केला होता. त्यांच्या या सर्व पैलूंचे संशोधन आणि अभ्यास तसेच प्रामुख्याने त्यांच्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे. त्यासाठी सावरकर विद्यापीठ स्थापन व्हायला हवे.

भीक मागून एसटीची स्वच्छता

सर्वसामान्य प्रवासी पुन्हा एकदा एसटीकडे वळावेत, या उद्देशाने दोन कोटी रुपयांची बक्षीस योजना एसटीने जाहीर केली आहे. पण ती करतानाही शासनाकडून किंवा तोट्यातील एसटी महामंडळाकडून कोणतीच आर्थिक तरतूद केली जाणार नाही. देणगीदार, उद्योजक, सामाजिक संस्थांकडून पैसे उपलब्ध करून घेऊन एसटी बस, उपाहारगृहे, बसस्थानके आणि परिसर स्वच्छ, सुंदर केला जावा, अशी ही योजना आहे. त्यातून निवड होणाऱ्या बसस्थानकांना बक्षिसे दिली जाणार आहेत. थोडक्यात म्हणजे कर्मचाऱ्यांनी देणगीदारांकडून पैसे उपलब्ध करून हे सौंदर्यीकरण करायचे आहे.