कोकणाचा उल्लेखही नाही

मोठा गाजावाजा होऊन जी ट्वेंटी शिखर परिषदेची पहिली बैठक मुंबईत पार पडली. मुंबईसह महाराष्ट्राची औद्योगिक तसेच पर्यटनदृष्ट्या भरभराट यावी, यासाठी या परिषदेत प्रयत्न केले जाणार आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील सह्याद्री पर्वतासह विविध ठिकाणांचा उल्लेख झाला, पण त्यात महाराष्ट्राचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणाचा साधा उल्लेखही झाला नाही.

नुसतेच बुडबुडे नकोत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच कोकणात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यापाठोपाठ ते रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत. बऱ्याच काळानंतर मुख्यमंत्री रत्नागिरीत येणार असल्यामुळे त्याबद्दलचे कुतूहल आहेच, पण आधीच्या घोषणेला पूरक अशी उद्योजकतेच्या दृष्टीने कोणती नेमकी घोषणा ते करणार आहेत, याबाबतची उत्सुकता आहे.

सवाल नको, कृतियुक्त जबाबही हवा

रिफायनरीच्या बाबतीत गाव विकास समितीने वेगवेगळे सवाल उपस्थित केले आहेत. या प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगार मिळणार आहे का, हा समितीचा प्रमुख प्रश्न आहे. गाव विकास समितीचे हे प्रश्न योग्यच आहेत. पण प्रश्न उपस्थित केले, म्हणजे ते सुटले, असे होत नाही. पण आपण उपस्थित केलेले प्रश्न सोडविण्यासाठी काही कृती करता येते का, याचाही विचार अशा संस्थांनी करायला हवा.

आता रिफायनरीवरच लक्ष द्यावे

उदय सामंत यांच्याकडे आता उद्योगमंत्रिपद आले आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करून घेऊन त्यांनी रिफायनरीसाठी अधिकाधिक वेळ दिला पाहिजे. प्रकल्पाला कितीही विरोध झाला तरी मतपरिवर्तन होऊ शकेल, अशी त्यांची धारणा आहे. ती लक्षात घेतली तर मुख्य प्रकल्पामध्ये ठरावीक तरुणांना मिळणार असलेल्या नोकऱ्यांपलीकडे जाऊन तेथे रोजगाराच्या दृष्टीने काय होणार आहे, याचा आढावा आणि नियोजन करणे आवश्यक आहे.