रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (सहा जून) एकाही नव्या करोनाबाधिताची नोंद झाली नाही. बरे झालेल्या ३० बाधितांना आज घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील सर्वाधिक २३ करोनाबाधित गावे (कन्टेन्मेंट झोन) संगमेश्वर तालुक्यात आहेत. दरम्यान, सिंधुदुर्गातील रुग्णांची संख्या ११६ झाली असून, आतापर्यंत १७ जणांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. ९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
प्रयोगशाळेकडून आज मिळालेले सर्व ४३ अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे. आज (सहा जून) ३० रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १५९ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ३४३ आहे. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला, तर १७१ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचारांखाली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात रुग्ण सापडलेली ११६ ठिकाणे करोनाबाधित म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा – रत्नागिरी – १५, गुहागर – आठ, खेड – १६, संगमेश्वर – २३, मंडणगड – २, दापोली – १६, लांजा – आठ, चिपळूण – १७, राजापूर – ११.
संस्थात्मक विलगीकरणात ७१ जण असून त्यांची केंद्रनिहाय संख्या अशी – रत्नागिरी जिल्हा रुग्णालय – ४३, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – १०, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – ४, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी – २, कोव्हिड केअर सेंटर, घरडा इन्स्टिट्यूट, लवेल, खेड – ५, ग्रामीण रुग्णालय, गुहागर – २, कोव्हिड केअर सेंटर, वेळणेश्वर, गुहागर – १, कोव्हिड केअर सेंटर, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली – ४.
मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केले जाते. आज रोज होम क्वारंटाइनखाली असणाऱ्यांची संख्या घटली असून, ती ६२ हजार ५८८ इतकी झाली आहे.
परराज्यातून आणि अन्य जिल्ह्यांतून रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळपर्यंत एक लाख २० हजार ८३ चाकरमानी दाखल झाले. रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यांत तसेच इतर जिल्ह्यांत ४८ हजार ८३० जण रवाना झाले.
टेस्टिंग लॅब उद्घाटन दोन दिवस उशिरा
रत्नागिरीतील करोना टेस्टिंग लॅबचा प्रारंभ आता सात जूनऐवजी नऊ जूनला होणार आहे. जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात करोना टेस्टिंग लॅबला शासनाने मंजुरी दिली. त्यासाठी लागणारी एक कोटी आठ लाखांची रक्कमही मंजूर झाली आहे. या लॅबचा प्रारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी (ता. ७ जून) होणार होता. परंतु त्यासाठी आवश्यक असणारी मशिनरी नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे दोन दिवस उशिरा पोहोचली आहे. त्यामुळे लॅबचे उद्घाटन नऊ जून रोजी होणार आहे.
