मुंबई : निसर्ग चक्रीवादळाने कोकणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकले आहे. घरे उद्ध्वस्त झाली आहेत. बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत, मच्छीमार उद्ध्वस्त झाले आहेत. आता पुन्हा कोकणला उभे करायचे आहे. कोकणाच्या दौ-यात कोकणाचे जे विदारक चित्र पाहिले, ते बदलायचे आहे, कोकणवासीयांना तात्कालिक मदत करायची आहे, तसेच शासनाने घोषित केलेली मदतही त्यांना मिळवून द्यायची आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या माध्यमातून आपण सारे मिळून कोकणाला पूर्वस्थितीत आणू, कोकणाला वैभवाचे दिवस पुन्हा आणू, असा ठाम विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी १६ जूनला व्यक्त केला.
चक्रीवादळामुळे झालेले कोकणाचे अतोनात नुकसान, शासनाने कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा केलेला प्रकार, तसेच शासनाकडून असलेल्या कोकणवासीयांच्या अपेक्षा आणि सध्या कोकणवासीय जगत असलेले खडतर जीवन याबाबत श्री. दरेकर यांनी फेसबुकला लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. (व्हिडिओसाठी येथे क्लिक करा.)
निसर्ग वादळामुळे कोकणाला मोठा फटका बसला असून बागा संपूर्णतः उदध्वस्त झाल्या आहेत. बागायतदारांना मदत करण्यासाठी मुंबईतील तरुणांच्या समूहाने आणि सेवाभावी समूहाने मदतीसाठी पुढे यावे. बागायतदारांना संकटात साथ द्यावी. दुःखातही सुख जाणता येईल या भावनेतून बागायतदारांना मदत करण्यासाठी श्रमदानातून पर्यटन करावे, असे आवाहन श्री. दरेकर यांनी केले.
मी कोकण नावाचे अभियान सुरू केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या अभियानांतर्गत प्रकल्प तयार करणे, पर्यटनास चालना देणे, मार्केटिंग करणे नवनवीन उद्योगांना महसूल उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या अभियानाच्या माध्यमातून कोकणात आमूलाग्र क्रांती घडेल असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.
कोल्हापुरात महापूर आला, त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ आला, तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरला मदतीचे सर्व निकष बदलून तातडीने मदतीचा हात दिला होता. परंतु दुर्दैवाने विद्यमान शासनाने तातडीने कोकणासाठी कोणतीही मदत दिलेली नाही, याचे शल्य मनात आहे. कोकणाला उभारी देण्यासाठी दीर्घकालीन काम करणे आवश्यक आहे. म्हणूनच मुंबई, ठाणे,पुण्यातील चाकरमान्यांनी आता कोकणाला मदत करण्यासाठी पुढे यायचे आहे. कोकणात फलोत्पादन आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी दिशादर्शक प्रकल्प अहवाल तयार करून कोकणला उभारी देऊ, असा विश्वास श्री. दरेकर यांनी व्यक्त केला.
कोकणला निसर्ग वादळाने झोडपले. यामुळे संपूर्ण रायगड रत्नागिरी किनारपट्टी उद्ध्वस्त झाली. निसर्गसंपन्न कोकण पर्यटनप्रेमींचे कोकण विस्कळित झाले. असे असताना कोकणच्या माणसाला धीर देण्याची आणि आधाराची आवश्यकता आहे. कोकणवासीय मुंबई, ठाणे, परदेशात कुठेही असो जेव्हा संकट आले, तेव्हा मदतीचा हात सेवाभावी भावनेतून दिला आहे. अशा वेळी कोकणवासीय सर्वांच्या मदतीला धावून जातो, असे असताना त्यालादेखील हात देण्याची विनंती फेसबुक लाइव्ह माध्यमातून श्री. दरेकर यांनी केली.
कोकणावर आज आभाळ फाटले आहे. त्याला ठिगळे लावून चालणार नाही. कोकणाच्या उभारणीसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ येणे आवश्यक आहे, असे आवाहनही त्यांनी केले. वादळाच्या तडाख्याने रायगडमधील १५ तर रत्नागिरी तालुक्यातील ९ तालुके बाधित झाले आहेत. त्याचबरोबर रायगडमधील १९०० ते २००० गावे आणि रत्नागिरीतील ८०० गावे बाधित झाली आहेत.रायगड जिल्ह्यात १ लाख ८१ हजार घरे अंशतः बाधित झाली असून रत्नागिरी, दापोली आणि मंडणगड येथे जवळपास ४० हजार घरे बाधित झाली आहेत. रायगडमध्ये १८ हजार घरे शंभर टक्के म्हणजेच पूर्ण बाधित असून जवळपास ९०० घरे रत्नागिरीत बाधित आहेत.बागांचेही मोठे नुकसान झाले असून १६ हजार ६० हेक्टरचे नुकसान झाल्याचे रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मंडणगड -दापोली परिसरात ४ ते ५ हेक्टर नुकसान झले आहे. विजेचे खांब उद्ध्वस्त, पाण्याच्या योजना बंद, वीज यंत्रणा ठप्प, मच्छीमार बांधवांच्या दोनशे ते अडीचशे बोटींचे नुकसान, जाळ्या खराब झाल्या आहेत. अशा उद्ध्वस्त अवस्थेत संवेदनशील व सहृदय महाराष्ट्राने पुढे यावे, असे आवाहन श्री. दरेकर यांनी केले आहे.
………………………