रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले असले तरी येत्या २५ तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने जिल्ह्यातील सर्व शाळांना शनिवारी, २२ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांनी त्याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.
श्री. सिंह यांनी म्हटले आहे की भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार २५ जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदी तसेच राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यातील इतर भागातही पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या परिस्थितीत जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी, पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयांना २२ जुलै रोजी सुट्टी देण्यात आली आहे.
शाळांना गुरुवार आणि शुक्रवारीही सुट्टी देण्यात आली होती. शनिवारीही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

