उद्योजक महोत्सवाच्या बाबतीतही तेच झाले. एवढा मोठा महोत्सव भरला. पण त्यावर झालेला प्रचंड खर्च लक्षात घेता त्या तुलनेमध्ये उद्योजकांनी महोत्सवात भाग घेतल्याचे दिसले नाही. रिकाम्या खुर्च्यांसमोर कार्यशाळांचे कामकाज सुरू होते. या योजना ज्यांच्यासाठी आहेत, त्यांच्यापर्यंत आधीच पोहोचायला हवे होते. पण तसे झाल्याचे दिसले नाही. केवळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हे घडले. केंद्रात पंतप्रधान आणि राज्यात मुख्यमंत्री लोकाभिमुख प्रशासनासाठी कितीही कंठशोष करत असले तरी निर्ढावलेले अधिकारी-कर्मचारी स्वतःमध्ये कोणताही बदल घडवत नाहीत. लोकांशी त्यांना देणेघेणेच नसते, हेच यामधून पुन्हा एकदा समोर आले आहे.
Tag: स्वच्छता
स्थानिक लोककलांची उपेक्षाच
एकाहून एक अत्यंत बहारदार कार्यक्रम रत्नागिरी महासंस्कृती महोत्सवात सादर करण्यात आले; पण स्थानिक लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी ठिकठिकाणी महासंस्कृती महोत्सव आयोजित केला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, पण रत्नागिरीत तरी स्थानिक लोककलांना चार तासांपैकी अवघा अर्ध्या तासाचा वेळ देण्यात आला होता. स्थानिक लोककलांना प्रोत्साहन द्यायचे असेल तर स्थानिक लोककलांच्या सादरीकरणासाठी एवढ्या कमी वेळेचे नियोजन कसे करण्यात आले, असा प्रश्न पडतो.
तेच ते आणि तेच ते
पंचवीस वर्षांनंतरच्या रत्नागिरी जिल्ह्याचे चित्र कसे असेल आणि कसे असावे, याचा ऊहापोह करणारा एक कार्यक्रम रत्नागिरीत पार पडला. कोकणाविषयीचे जे मुद्दे मांडले गेले, त्याला चर्चासत्र म्हटले असले, तरी त्याचे स्वरूप तसे नव्हते. कारण चर्चासत्रातून एखादे सार काढले जाते. तसे याबाबतीत झाले नाही. सर्व भाषणे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ऐकली. पण त्यांनी त्या मुद्द्यांसंदर्भात काहीही ठोस सांगितले नाही. उद्योग विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा त्यांनी घेतला. पण राज्याच्या इतर भागांपेक्षा कोकणात उद्योगांना विरोध होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
आता ग्रामस्थांनीच शोध घ्यावा
महिलांच्या सॅनिटरी पॅडची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सॅनिटरी पॅड डिस्पोजेबल मशीन म्हणजेच इन्सिनरेटर खरेदी करण्यासाठी प्रत्येक गावाला जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून दिला होता, पण मोजक्या ग्रामपंचायती वगळता अन्य बहुसंख्य ग्रामपंचायतींनी इन्सिनरेटर बसविलेले नाहीत. नेहमीच्या कचऱ्यापेक्षा सॅनिटरी पॅडसारखा वैद्यकीय कचरा नागरी आरोग्यासाठी अत्यंत घातक असतो. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीला निधी देण्यात आला होता. या निधीचे काय झाले, याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही नाही.
गावांच्या मागासलेपणासाठीच प्रयत्न
प्रजासत्ताक दिनी या सर्व गावांमध्ये ग्रामसभांचे आयोजन केले जाते. ग्रामसभेला त्या त्या गावाची संसद असे म्हटले जाते. गावातील प्रत्येक ग्रामस्थ या ग्रामसंसदेचा सदस्य असतो. त्या न्यायाने गावाविषयीचा साधक बाधक विचार या ग्रामसभांमध्ये व्हावा, अशी अपेक्षा असते. मात्र प्रजासत्ताकाची ७४ वर्षे पूर्ण करणाऱ्या आपल्या देशामध्ये या ग्रामसभा त्याच दिवशी होण्याचे आणि त्यामध्ये योग्य तो विचार होण्याचे प्रमाण दोन टक्क्यांहून अधिक नाही ही दुर्दैवाची बाब आहे.
स्वच्छ महाराष्ट्रात रत्नागिरी नाही?
कचरा आपण करायचा आणि त्याची विल्हेवाट सरकारने लावायची, असा नियमच होऊन गेल्यामुळे कचऱ्याने गंभीर रूप धारण केले आहे. ते सुधारले, तर देशात स्वच्छ राज्य म्हणून मिरवायला काहीतरी अर्थ राहील. नाहीतर लोकांनी ऑनलाइन दिलेल्या प्रतिक्रिया आणि तयार करून दिलेली स्वच्छतेची छायाचित्रे एवढ्या निकषावरच स्वच्छ शहरांची निवड करायची झाली, तर त्याद्वारे मिळालेली प्रमाणपत्रे जेथे लावली जातील, तेथेच खालच्या कोपऱ्यात कचराच कचरा असेल.