रत्नागिरीतील ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ प्रमोद ऊर्फ रघुवीर भिडे आणि ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ दिलीप मोरे या दोघांच्या अवघ्या अकरा दिवसांत झालेल्या निधनामुळे दोन वेगवेगळ्या शाखांमधील वैद्यकीय शाखांचे आणि त्यावर अवलंबून असलेल्या रुग्णांचे फार मोठे नुकसान झाले आहे. दोघेही करोनाच्या आजाराने निधन पावले, हा एक दुर्दैवी योगायोग. वैद्य भिडे यांचे करोनाविषयीचे आयुर्वेद शास्त्रानुसार संशोधन सुरू होते, तर डॉक्टर मोरे यांनी करोनाबाधित ४४ बालकांना करोनाच्या दाढेतून बाहेर काढून नवजीवन प्राप्त करून दिले होते. या दोघांचाही दुर्दैवी अंत करणाऱ्या आजारामुळे आरोग्य यंत्रणा आणि ती चालविणारी शासन यंत्रणा याविषयीचे अनेक प्रश्न निर्माण होतात.