उद्योजक महोत्सवाच्या बाबतीतही तेच झाले. एवढा मोठा महोत्सव भरला. पण त्यावर झालेला प्रचंड खर्च लक्षात घेता त्या तुलनेमध्ये उद्योजकांनी महोत्सवात भाग घेतल्याचे दिसले नाही. रिकाम्या खुर्च्यांसमोर कार्यशाळांचे कामकाज सुरू होते. या योजना ज्यांच्यासाठी आहेत, त्यांच्यापर्यंत आधीच पोहोचायला हवे होते. पण तसे झाल्याचे दिसले नाही. केवळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हे घडले. केंद्रात पंतप्रधान आणि राज्यात मुख्यमंत्री लोकाभिमुख प्रशासनासाठी कितीही कंठशोष करत असले तरी निर्ढावलेले अधिकारी-कर्मचारी स्वतःमध्ये कोणताही बदल घडवत नाहीत. लोकांशी त्यांना देणेघेणेच नसते, हेच यामधून पुन्हा एकदा समोर आले आहे.