मुंबई : कांजूरमार्ग येथे सामाजिक कार्य करणाऱ्या माऊली प्रतिष्ठानतर्फे कोकणवासीयांसाठी माफक दरात बससेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विठ्ठल नाकाडे यांनी ही माहिती दिली.
मुंबईत राहणारे कोकणातील चाकरमानी गणेशोत्सवाची वाट पाहत असतात. तो सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी दर वर्षी तीन-चार महिने आधीच कोकणात जाणाऱ्या नियमित आणि जादा रेल्वे तसेच आणि एसटीच्या गाड्यांचे आरक्षण फुल होते; मात्र करोनामुळे या वेळची स्थिती वेगळी आहे. तरीही मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी काही सवलती देण्यात आल्या आहेत; मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे गावी जाण्यासाठी मुंबईतील चाकरमानी एसटी बसेस, तर काही जण खासगी गाड्यांचा आधार घेत आहेत. परंतु एसटी गाड्या अपुऱ्या पडणार असून, खासगी वाहनांची तिकिटे दुपटीपेक्षा अधिक दराने विकली जात आहेत. त्यात ई-पास लवकर मिळणे कठीण असते.
ही गैरसोय लक्षात घेऊन कांजूरमार्ग (पूर्व) येथील माऊली प्रतिष्ठानने सामाजिक जाणिवेतून कांजूरमार्ग परिसरातील कोकणवासीयांसाठी ई-पाससह माफक दरात बससेवेची सोय केली आहे. त्यामध्ये सावंतवाडी, मालवण, देवगड, रत्नागिरी, खेड असे बसमार्ग असून, आज त्यातील खेड आणि चिपळूणच्या दोन गाड्या रवाना झाल्या. उद्यापासून दररोज सायंकाळी ५ वाजता स्टेट बँक (कांजूरमार्ग-पूर्व) येथून गाड्या सुटणार आहेत. प्रत्येक बसमध्ये २५ प्रवासी असतील. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्यासाठी प्रवाशांनी काही नियम अटी पाळणे आवश्यक आहे. त्या अशा – प्रत्येकाला आधारकार्ड झेरॉक्स आणि वैद्यकीय दाखला आणावा लागेल. बुकिंग रक्कम रोख स्वरूपात द्यावी लागेल. प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक असेल. ई-पास देण्याची सुविधा माऊली प्रतिष्ठानकडून करण्यात येणार आहे.
या बससेवेबाबतच्या अधिक माहितीसाठी संपर्क :
भूषण नेवाळकर – ८८९८१३८२०३ (सावंतवाडी बस मार्ग)
सचिन हडकर – ९५९४७८१३४३ (मालवण बस मार्ग)
रूपेश मगदूम ७७१८०४६८५१ (देवगड बस मार्ग)
प्रतीक महाडिक ७७१८०८९०१६ (रत्नागिरी बस मार्ग)
अतुल खेडेकर ९८२०४७४६४५ (खेड बस मार्ग)
सिद्धार्थ कदम – ७०४५०८२४२४
हरेश राणे – ७७३८०३७३७५