रत्नागिरी : मिऱ्या येथील धूपप्रतिबंधक बंधारा समुद्रकिनारे वाचवण्याबरोबरच जमीन, शेतीचे, गावांचे संरक्षण करून निसर्ग, पशुपक्ष्यांचा अधिवास, कांदळवनांचे संरक्षण करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीतील मुरूगवाडा पांढरा समुद्र ते मिऱ्या (मोरे टेंबे) या साडेतीन किलोमीटर लांबीच्या टेट्रापॉड आणि ग्रोयनच्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन श्री. पवार यांच्या हस्ते आज (दि. २६) झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कोनशिलेचे अनावरण करून उपमुख्यमंत्र्यांनी बंधाऱ्याच्या प्रकल्पाची सविस्तर माहिती करून घेतली. यावेळी ते म्हणाले की, करोना महामारी, तौक्ते, क्यार, निसर्ग चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक संकटांवर मात करुन शासनाने सर्वांगीण विकासाची कामे केली आहेत. मिऱ्या येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यामुळे पांढऱ्या समुद्र किनाऱ्याची धूप थांबणार आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या जमिनीचे, शेतीचे, गावांचे संरक्षण होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे समुद्राला त्याच्या सीमेत अडविण्याचे काम हा बंधारा करेल. या प्रकल्पासाठी जवळपास १९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पाच्या सुशोभीकरणासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीचीही तरतूद तत्काळ करण्यात येईल. या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम दोन वर्षांत पूर्ण होईल, अशी हमी त्यांनी यावेळी दिली. बंधाऱ्याचे व सुशोभिकरणाचे काम उत्कृष्ट व दर्जेदार झाले पाहिजे. पुढची ५० वर्षे डोळ्यांसमोर ठेवून चांगल्या प्रतीचे काम झाले पाहिजे.
शहराच्या सार्वजनिक बाबींच्या विकासासाठी शासनाला स्थानिकांकडून जमिनी घ्याव्या लागतात. रत्नागिरीचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करताना स्थानिकांनी याबाबत सहकार्य करावे. त्यांच्या सहकार्याबद्दल योग्य तो मोबदला दिला जाईल, असे ते म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रशासकीय व औद्योगिकदृष्ट्या सर्वांगीण विकासाबद्दल बोलताना ते म्हणाले की, रायगड येथील रेवस ते सिंधुदुर्ग येथील रेडी महामार्गासाठी ९ हजार ५७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना व त्याअंतर्गत दोन्ही जिल्ह्यांत साधनसंपत्तीचा वापर करून उद्योगविकासासाठी १०० कोटी देण्यात आले आहेत. श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळासाठी ५० कोटी रुपये, राजापूरच्या धूतपापेश्वर मंदिराचा विकास, रत्नागिरीत भगवती बंदरात क्रूझ टर्मिनलची उभारणी, . अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध, तसेच रत्नागिरी जिल्ह्यासाठी सर्व सोयीसुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध अशा प्रशासकीय इमारतीच्या निर्मितीसाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
रत्नागिरीच्या पर्यटनाविषयी बोलताना ते म्हणाले की, रत्नागिरी किनाऱ्यांवरच्या पर्यटनवाढीलाही याचा उपयोग होईल. रत्नागिरी जिल्ह्याला २६७ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. हा किनारा जगातला सर्वांत स्वच्छ, सुंदर, निसर्गसंपन्न किनारा आहे. गावखडीचा किनारा, आरे-वारेचा किनारा, गणपतीपुळ्याचा किनारा, प्रत्येक किनारा हा अप्रतिम, सुंदर आहे. रत्नदुर्ग किल्ला, पांढरा समुद्रकिनारा, औषधी वनस्पतींनी समृद्ध असा मिऱ्याचा डोंगर, इथून जवळ असलेले अॅक्वॅरियम, स्कूबा डायव्हिंगची सोय अशा अनेक गोष्टींचा विकास आणि प्रसिद्धी, प्रभावीपणे केल्यास, रत्नागिरीत निश्चितपणे पर्यटकांचा ओघ वाढेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गेल्या दोन वर्षांत निसर्ग, तौक्ते अशा अनेक वादळांनी कोकणच्या किनारपट्टीवर नुकसान केले. अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळल्यानेही मोठे नुकसान झाले. या संकटकाळात शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, फळबागायतदारांच्या, मच्छीमारांच्या, दुकानदारांच्या, व्यापाऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन आपण आपत्तीग्रस्तांना मदत केली. करोना काळात मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहून उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी करोनाप्रतिबंधक सूचनांचे व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. विशेषत: ३१ डिसेंबर रोजी नियमांचे काटेकोर पालन झालेच पाहिजे, याकरिता पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडू नये, अशी कळकळीची व आग्रहाची विनंती त्यांनी यावेळी केली.
यावेळी पालकमंत्री ॲड. अनिल परब म्हणाले, मुंबईच्या नरिमन पॉइंटला ज्या प्रमाणे पर्यटक भेट देतात, त्याचप्रमाणे येथेही पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतील. हा बंधारा भविष्यात रत्नागिरीचे वैभव म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
यावेळी गृह(शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार विनायक राऊत, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.