कोकणच्या इतिहासाला अविरत संशोधनातून नवा आयाम देणारे, असंख्य अभ्यासकांचे श्रद्धास्थान असलेले ९३ वर्षीय इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांचे ११ ऑक्टोबर रोजी चिपळूणला निधन झाल्याचे वृत्त कळताच धक्का बसला. गेल्या १६ जुलै २०२२ रोजी चिपळूण तालुक्यात शिरगाव येथे झालेल्या तासभराहून अधिक काळ झालेल्या भेटीत त्यांच्या बोलण्यातील आत्मविश्वासावरून अण्णा शतक पूर्ण करतील, असे वाटत होते. मात्र ९३ व्या वर्षी त्यांना मृत्यूने गाठले. त्यांच्या अशा जाण्याने कोकणचा इतिहासपुरुष आता इतिहासजमा झाला आहे.
अण्णांची झालेली पहिली भेट माझ्या आजही चांगलीच स्मरणात आहे. २५ डिसेंबर २०१५ रोजी मी आमच्या लांजा ज्युनियर कॉलेजची शैक्षणिक सहल घेऊन दापोली तालुक्यातील दाभोळ या ऐतिहासिक गावाला भेट दिली होती. यावेळी कोकणातील शोधक पत्रकार आणि पर्यटन अभ्यासक म्हणून दखलपात्र काम करणारे धीरज वाटेकर यांच्या माध्यमातून अण्णांच्या दाभोळ येथील “अपरान्त” निवासस्थानी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान अण्णांची भेट झाली. यावेळी घराच्या अंगणात माझ्यासह सहलीत सहभागी झालेल्या ४१ मुलांनी अण्णांशी संवाद साधला. यावेळी अण्णांनी ४० मिनिटांच्या व्याख्यानात इतिहासप्रसिद्ध दाभोळ बंदराचा इतिहास आपल्या नर्मविनोदी शैलीत उलगडला. यावेळी अण्णांनी अनेक दशके अथक मेहनतीतून कोकण धुंडाळून जमा केलेला संग्रह व पुस्तकांचा खजिना आम्हाला दाखविला. शिक्षक म्हणून जास्तीत जास्त पुस्तके वाचा, तरच समृद्ध पिढी घडवाल, असा प्रेमळ सल्लाही त्यांनी दिला. या पहिल्याच भेटीत कोकणच्या इतिहासाला नवा आयाम देणाऱ्या इतिहास संशोधक अण्णांच्या व्यक्तिमत्त्वाने मनावर कायमचीच मोहिनी घातली. इतिहास आणि कोकण हे आवडीचे विषय असल्याने पुढे अण्णांशी शिष्यत्वाचे नातेच जडले.

इतिहासाच्या वेडापायी अख्खा कोकण पायथा घालून अण्णांनी ताम्रपट, शिलालेख, प्राचीन मूर्ती, हस्तलिखिते, दुर्मिळ पत्रे, शस्त्रे, नाणी शोधून काढत कोकणच्या इतिहासावर प्रकाश टाकण्याचे काम करीत कोकणला प्राचीन इतिहास नाही, असे म्हणणाऱ्या अभ्यासकांचे पुराव्यानिशी म्हणणे खोडून काढले. याकामी त्यांनी अथक मेहनतीतून शोधलेल्या ९ ताम्रपटांनी तर मोठ्या इतिहास संशोधन संस्थाही अवाक् झाल्या. कोकणच्या इतिहासावर अधिक संशोधन व्हावे, नव्या तरुण अभ्यासकांनी याकडे वळावे यासाठी डॉ. दाऊद दळवी, रवींद्र लाड यांच्यासह त्यांनी कोकण इतिहास संशोधन परिषदेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. गेटवे ऑफ दाभोळ, शोध अपरान्ताचा, प्रकाशदीप, इकडचं तिकडचं, मॉरिशस, इस्राईल आणि युरोप, ऐतिहासिक दाभोळ-वर्तमान व भविष्य, शेवचिवडा इत्यादी दर्जेदार पुस्तके लिहून मराठी वाङ्मय व कोकणचा इतिहास या विषयात त्यांनी मौलिक भर घातली. इतिहासाबरोबरच मराठी भाषेवरील प्रेमापोटी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दापोली शाखेला त्यांनी दिशा दिली. दापोलीत झालेल्या कोमसापच्या साहित्य संमेलनातील त्यांचे अध्यक्षीय भाषण कोकणातील मराठी साहित्य विश्वाची माहिती देणारे होते. तेव्हाच्या सावंतवाडीपासून मंडणगडपर्यंत पसरलेल्या रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा परिषदेतील बांधकाम सभापतिपद भूषवत त्यांनी राजकरणात तत्त्वनिष्ठता, वैचारिक अधिष्ठान जपत मोठा लोकसंग्रह निर्माण केला. मात्र ते जास्त वेळ राजकरणात रमले नाहीत.

साधारण २०१६ च्या आसपास आपण लांज्याला कोकण इतिहास परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन भरवू या, अशी इच्छा त्यांनी माझ्याकडे व्यक्त केली. या संदर्भात बैठक घेण्यासाठी रवींद्र लाड, सदाशिव टेटविलकर, प्रवीण कदम, डॉ. विद्या प्रभू, डॉ. अजय धनावडे या मंडळींसह अण्णा लांज्याला आले होते. तेव्हा लांजा महाविद्यालयात झालेल्या बैठकीत लांज्याचा आजवर पुढे न आलेला इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी लांजेकरांनी या परिषदेच्या आयोजनात पुढाकार घ्यावा, असा आग्रहही त्यांनी केला. मात्र तांत्रिक कारणांनी ती परिषद पुढे लांज्यात आयोजित करता न आल्याने अण्णांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाची संधी मात्र आम्ही गमावल्याची खंत मला अनेक दिवस बोचत राहिली. मात्र या नंतरही अण्णा मोबाइलवरून आस्थेने संपर्क साधून वडिलकीच्या नात्याने चौकशी करीतच राहिले. यामुळेच त्यांच्या साध्या, निर्मळ स्वभावाने अनेकांना मोहिनी घातली.
करोनाच्या वैश्विक संकटात मराठी भाषेतील अनेक दिवाळी अंक बंद पडण्याच्या मार्गावर असताना आम्ही मार्गदर्शक सुभाष लाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोडी लिपीचा प्रचार करणारा मोडीदर्पण दिवाळी अंक पुन्हा एकदा प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. याचा अण्णांना आनंद झाला होता. कारण लाड सरांनी मुंबईत ‘मोडी लिपी मित्र मंडळाची’ स्थापना केली, तेव्हा मोडी लिपीच्या प्रचारार्थ १९९७ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अण्णा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गतवर्षीच्या मोडीदर्पण दिवाळी अंकातील त्यांचा ‘जुनं आता काय राहिलंय नाय!’ हा विचार करायला प्रवृत्त करणारा लेख वाचून अनेक वाचकांनी लेख आवडल्याचे अभिप्राय कळवत अण्णांविषयी आदरभाव व्यक्त केला.
खरे तर अण्णा ऐषोआरामी आयुष्य सहज जगले असते, मात्र दाभोळच्या खाडीपरिसरातील वंचित, गरजू, बहुजन मुलांच्या भविष्याचा विचार त्यांच्यातील समाजसेवकाला स्वस्थ बसू देत नव्हता. या उपेक्षितांच्या आयुष्यात आनंदाचा मळा फुलविण्यासाठी अण्णांनी १९८३ साली सागरपुत्र विद्या विकास संस्थेची स्थापना केली. यामुळे अनेकांच्या जीवनाला दिशा मिळाली. अण्णांच्या सहवासात जीवनाचे नेमके प्रयोजन कळल्याने सागरपुत्र संस्थून बाहेर पडलेला प्रत्येक विद्यार्थी आज सेवाव्रती भावनेने समाजात कार्यरत आहे. अण्णांच्या त्यागाचे ते अवीट फळ आहे.
नंदिनी काकूंवर असलेल्या निस्सीम प्रेमाचे प्रतीक म्हणून त्यांनी शब्दबद्ध केलेले आनंदिनी तर प्रत्येक पुरुषाने आपल्या जीवनातील स्त्रीशक्तीकडे कसे पाहावे, याचा वस्तुपाठ घालून देणारेच आहे. त्यांच्या सगळ्या कार्यात सोबत असणारी नंदिनी काकू साथ सोडून गेल्यावर मात्र अण्णा आतून खचले होते. तरीही सहकाऱ्यांच्या साथीने त्यांनी आपल्या सहचारिणीचा प्रत्येक स्मृतिदिनाला साहित्यिक निर्मितीतून वाहिलेली आदरांजली हे वाङ्मयीन चळवळीतील दुर्मिळ उदाहरण असावे. यामुळेच ते वेगळे ठरले. अखेरच्या श्वासापर्यंत स्मरणशक्ती, श्रवणशक्ती, चिंतन-मननशक्ती या त्यांच्या सर्व शक्ती शाबूत होत्या, हे त्यांचे आणि आपले भाग्यच!
सृष्टी फुलविण्यासाठी विधात्याने आपल्याला जन्माला घातले आहे, हे जीवनाचे प्रयोजन समजलेली माणसे कामालाच पूजा मानून सतत कार्यमग्न असतात. ही कार्यमग्नताच दीर्घायुषी जीवनाचे गुपित आहे. हे सहस्रचंद्रदर्शन सोहळा अनुभवलेल्या व्यक्तींशी साधलेल्या सहजसंवादातून सहज उमगते. आयुष्यभर कार्यमग्न राहून स्वर्गीय सुंदर कोकणच्या इतिहासाला नवा आयाम देणारे ९३ वर्षीय इतिहास संशोधक, कोकणचा चालता बोलता कोश बनलेल्या अण्णा शिरगावकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, सामाजिक कार्यकर्ते सुभाष लाड यांच्यासह आम्ही १६ जुलै २०२२ रोजी म्हणजे साधारण तीन महिन्यांपूर्वी शिरगाव येथे त्यांच्या मुलीच्या घरी त्यांची सदिच्छा भेट घेतली. आयुष्यभर समाजासाठी, कोकणच्या इतिहासासाठी, वंचितांच्या शिक्षणासाठी झटलेल्या अण्णांचा सत्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा, हे त्यामागचे प्रयोजन होते. मात्र आम्ही सत्कार करण्याआधीच भरभरून देणाऱ्या हातांनी आम्हा तिघांच्या खांद्यावर आमच्या कार्याचे कौतुक म्हणून आयुष्यभर पुरेल इतक्या मायेची ऊब देणारी शाल पांघरून “सार्थकी जगणे” या संकल्पनेचा अर्थ उलगडून दाखविला. अण्णांच्या या अनपेक्षित कृतीने डोळ्यांत कृतज्ञतेच्या आसवांनी दाटी केली होती. आम्ही करीत असलेल्या बिनखुर्चीच्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचेही त्यांनी कौतुक केले. हा क्षण कायमचाच हृदयात कोरला गेला.
कोकणच्या इतिहासाला प्रकाशात आणणारा हा नंदादीप मालवल्याचे वृत्त आज सकाळी कळताच धक्काच बसला. मात्र या नंदादीपाने दाखविलेल्या प्रकाशात कोकणचा इतिहास अधिक उठून दिसेल, हे निश्चित! एकूणच,
उत्कट भव्य तेंची घ्यावे।
मळमळीत अवघेंचि टाकावे।
निःस्पृहपणे विख्यात व्हावे। भूमंडळी।
या उक्तीला अनुसरून जगणे जगणाऱ्या अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली!
- विजय हटकर, लांजा
(संपर्क – ८८०६६३५०१७)


